For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एकटा लढला जैस्वाल, टीम इंडिया 6/336

06:58 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
एकटा लढला जैस्वाल   टीम इंडिया 6 336
Advertisement

जैस्वालच्या नाबाद 179 धावा : टीम इंडियाचे धुरंदर पुन्हा अपयशी : शोएब बशीर, रेहानचे प्रत्येकी दोन बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम

युवा फलंदाज आणि सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या नाबाद 179 धावांच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी 6 बाद 336 धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यशस्वी 179 आणि आर आश्विन 5 धावांवर खेळत होते. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर टीम इंडियाचे धुरंदर पुन्हा अपयशी ठरले. जैस्वालने मात्र एकहाती किल्ला लढवताना इंग्लिश गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. विशेष म्हणजे, अवघ्या सहा कसोटी खेळणाऱ्या जैस्वालची ही कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. आता मॅचच्या दुसऱ्या दिवशी यशस्वी द्विशतक करेल का, याची सर्वांना उत्सुकता आहे.

Advertisement

प्रारंभी, या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी दमदार सुरुवात केली. कर्णधार रोहित आणि जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी केली. कर्णधार रोहित मोठी खेळी खेळेल असे वाटत होते, पण तो नवोदित फिरकी गोलंदाज शोएब बशीरच्या जाळ्यात अडकला. रोहित 14 धावा करून बाद झाला. यानंतर पहिल्या सत्रात शुभमन गिलदेखील (46 चेंडूत 34) जेम्स अँडरसनचा बळी ठरला. गिल देखील चांगल्या टचमध्ये दिसत होता, पण तो मोठी खेळी करून शकला नाही.

जैस्वालचे शानदार शतक

शुभमन गिल बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वाल यांनी 90 धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान यशस्वीने 151 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. टॉम हार्टलीच्या चेंडूवर षटकार खेचून यशस्वीने आपले शतक पूर्ण केले. यशस्वीच्या कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक ठरले. याआधी मागील वर्षी विंडीजविरुद्ध त्याने शतकी खेळी साकारली होती. विशेष म्हणजे, सलामीचे दोन गडी लवकर बाद झाल्यानंतर जैस्वालने जबाबदारी खेळताना नवोदित गोलंदाज शोएब बशीर व रेहान अहमद यांची चांगलीच धुलाई केली.

जैस्वाल एका बाजूने किल्ला लढवत असताना दुसरीकडे टीम इंडियाच्या इतर फलंदाजांची मात्र त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. श्रेयस अय्यरदेखील गिलप्रमाणेच सेट झाल्यानंतर बाद झाला. अय्यरला 27 धावांवर बाद करत हार्टलीने ही जोडी फोडली. पण त्यानंतर यशस्वीने नवोदित खेळाडू रजत पाटीदारसोबत चौथ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. पाटीदार बाद झाल्यानंतर अक्षर पटेलने 4 चौकारासह 27 तर श्रीकर भरतने 17 धावा केल्या. यानंतर जैस्वाल व आर. अश्विन यांनी दिवसअखेरीस आणखी पडझड होऊ दिली नाही. टीम इंडियाचे धुरंदार पॅव्हेलियनमध्ये परतत असताना यशस्वी मात्र एकटा लढला. दिवसअखेर त्याने 257 चेंडूत 17 चौकार व 5 षटकारासह नाबाद 179 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 93 षटकांत 6 गडी गमावत 336 धावा केल्या होत्या.

इंग्लंडकडून शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या तर जेम्स अॅडरसन आणि टॉम हार्टले यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

संक्षिप्त धावफलक : भारत 93 षटकांत 6 बाद 336 (यशस्वी जैस्वाल खेळत आहे 179, रोहित शर्मा 14, गिल 34, श्रेयस अय्यर 27, पाटीदार 32, अक्षर पटेल 27, आर. अश्विन खेळत आहे 5, बशीर व अहमद प्रत्येकी दोन बळी).

दुसऱ्या कसोटी शतकानंतर जैस्वालचा अनोखा विक्रम

वयाच्या बाविशीत टीम इंडियाकडून सहावी कसोटी खेळताना जैस्वालने दुसऱ्या शतकाची नोंद केली. त्याने इंग्लंडविरुद्ध दमदार शतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. गेल्या काही दिवसांपासून संधी मिळताच जेव्हा जेव्हा टीम इंडियाला गरज पडली आहे, तेव्हा यशस्वीने जबाबदारी घेतली आहे. विशेष म्हणजे यशस्वीचे भारतातील हे पहिलेच कसोटी शतक आहे. यासह त्याने या खेळीत अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. जैस्वाल मायदेशात कसोटी शतक करणारा दुसरा सर्वात युवा सलामीवीर ठरला आहे. या यादीत पहिला क्रमांक पृथ्वी शॉ याचा आहे.

याशिवाय, कसोटीत पहिल्या दिवशी सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तो सहाव्या स्थानी आला आहे. वीरेंद्र सेहवाग या यादीत पहिल्या स्थानावर आहे. 2004 मध्ये त्याने पाकविरुद्ध पहिल्याच दिवशी 224 धावा केल्या होत्या. जैस्वालने इंग्लंडविरुद्ध पहिल्या दिवशी 179 धावा करत या यादीत सहावे स्थान मिळवले आहे.

मायदेशात कसोटी शतक करणारे युवा सलामीवीर फलंदाज

पृथ्वी शॉ -  18 वर्ष 329 दिवस वि. वेस्ट इंडिज (2018)

यशस्वी जैस्वाल -  22 वर्ष 36 दिवस वि. इंग्लंड (2024)

मोटगनहल्ली जयसिंह - 22 वर्ष 285 दिवस वि. इंग्लंड (1961)

शिवसुंदर दास - 23 वर्ष 20 दिवस वि. झिम्बाब्वे (2000)

रजत पाटीदारचे कसोटी पदार्पण, सिराजला विश्रांती

रजत पाटीदारला भारताकडून कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. भारताच्या प्लेइंग इलेव्हनसाठी रजत पाटीदार आणि सरफराज खान यांच्यात रंजक लढत झाली. मात्र, कर्णधार रोहित शर्माने सरफराजच्या जागी रजतला संघात स्थान दिले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रजतने शानदार कामगिरी केली असून अलीकडेच इंग्लंड लायन्सविरुद्ध त्याने चांगली कामगिरी केली होती. दरम्यान, या सामन्यात सिराजला विश्रांती देत मुकेश कुमार व कुलदीप यादवला संघात स्थान दिले आहे.

Advertisement
Tags :

.