सैन्याला राजकारणात ओढणे चुकीचे
माजी वायुदल प्रमुख भदौरिया यांचे वक्तव्य : अग्निवीरप्रकरणी राहुल गांधींकडून खोटा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सैन्याला राजकारणात ओढणे चुकीचे आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हुतात्मा अग्निवीराच्या परिवाराला भरपाई न मिळाल्याचा केलेला दावा खोटा आहे. याप्रकरणी राहुल गांधी यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि देशाची माफी मागायला हवी असे वक्तव्य माजी वायुदल प्रमुख आणि भाजप नेते आरकेएस भदौरिया यांनी शुक्रवारी केले आहे.
हुतात्मा अग्निवीराच्या परिवारांना भरपाईदाखल 1 कोटी रुपये दिले जात असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितले होते. यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ जारी करत राजनाथ सिंह खोटे बोलत असल्याचा आरोप केला होता. लुधियानातील हुतात्मा अग्निवीरच्या पित्याने कुठलीच भरपाई मिळाली नसल्याचे सांगितले असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता.
राहुल गांधी यांच्या या दाव्यानंतर सैन्याने सोशल मीडियावर पोस्ट करत हुतात्म्याच्या परिवाराला 98 लाख रुपये देण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. तर वाद उभा ठाकल्यावर हुतात्मा अग्निवीराच्या पित्याने देखील 98 लाख रुपये प्राप्त झाल्याचे मान्य केले होते.
अग्निवीर योजना अत्यंत चांगली असून ती प्रदीर्घ चर्चेनंतर लागू करण्यात आली आहे. भारतीय सैन्याला अशाप्रकारच्या राजकारणात ओढले जाऊ नये. हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असल्याचे भदौरिया यांनी राहुल गांधींना सुनावले आहे.
अग्निवीर योजनेच्या अंतर्गत नियुक्त होणाऱ्या जवानांच्या प्रशिक्षण गुणवत्तेवरून कुठलाच संशय निर्माण होत नाही. या योजनेच्या अंतर्गत नियुक्त जवान नियमित जवानांपेक्षा कुठल्याही प्रकारे कमी कुशल नसतील. हे जवान नियमित जवानाप्रमाणेच युद्धात लढतील. युवांनी या योजनेत सामील व्हावे, स्वत:ची दिशाभूल होऊ देऊ नये. अग्निवीर योजनेवर संसदेत मोठी चर्चा झाली आहे. आता एका नव्या चर्चेला जन्म दिला जात असल्याचे म्हणत भदौरिया यांनी काँग्रेस नेत्याला लक्ष्य केले आहे.