भारताशी युद्ध न करण्यातच शहाणपणा
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पहलगाममध्ये निर्दोष पर्यटकांच्या नरसंहाराने पूर्ण भारतात आक्रोश आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर 130 हून अधिक देशांनी भारताच्या नेतृत्वाशी संपर्क साधत स्वत:च्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच दहशतवाद विरोधी लडाईत भारताला साथ देण्याचे आश्वासन दिले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणाव वाढला आहे. पाकिस्तानी सैन्याने पीओकेतील स्वत:च्या हालचाली वाढविल्या असून मोठ्या संख्येत जवानांना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक जमविले आहे. या सर्व हालचालींदरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना त्यांच्या ज्येष्ठ बंधू आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना मोठा सल्ला दिला आहे. नवाज शरीफ यांनी पंतप्रधान शाहबाज यांना भारताशी युद्ध न करण्याचा आणि तणाव दूर करण्याचा सल्ला दिला आहे.
नवाज शरीफ यांनी शाहबाज यांना भारतासोबत युद्ध न करण्याचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या निर्णयांविषयी माहिती दिली होती. ही बैठक भारताकडून सिंधू जलकरार निलंबित करण्यात आल्यावर घेण्यात आली होती. शाहबाज यांनी नवाज यांना पहलगाम हल्ल्यानंतर उद्भवलेल्या स्थितीची विस्तृत माहिती दिली होती. यानंतर नवाज शरीफ यांनी भारतासोबतचा तणाव कमी करण्याचा सल्ला दिला. नवाज शरीफ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान असण्यासह पाकिस्तानचे वरिष्ठ नेते देखील आहेत.
तणाव कमी करा : नवाज
नवाज शरीफ यांनी स्वत:च्या देशाच्या सरकारला भारतासोबतचा तणाव कमी करण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तानचे तीनवेळा पंतप्रधान राहिलेले नवाज शरीफ हे वर्तमान पंतप्रधान शाहबाज यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. पाकिस्तानात सर्वात मातब्बर नेत्यांमध्ये गणले जाणाऱ्या नवाज शरीफ यांनी भारतासोबत युद्धाच्या दिशेने पावले टाकू नका, तर कूटनीतिक मार्गाने तणाव कमी करण्याचा सल्ला स्पष्टपणे शाहबाज यांना दिला आहे. पाकिसतनी नेत्यांकडून भारताच्या विरोधात चिथावणीपूर्ण वक्तव्ये करण्यात येत असताना नवाज यांच्याकडून हा सल्ला देण्यात आला आहे.
तणाव कमी करण्यावर काम करा
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासोबत निर्माण झालेल्या तणावादरम्यान शाहबाज शरीफ यांनी स्वत:चे बंधू नवाज यांची भेट घेतली. यादरम्यान शाहबाज यांनी भारतासोबतच्या तणावाच्या संबंधी स्वत:च्या सरकारच्या निर्णयांची माहिती देत देश कुठल्याही आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचे सांगितले हेत. यावर नवाज शरीफ यांनी आक्रमक भूमिका घेण्याच्या विरोधात असल्याचे स्पष्ट केले. दोन अण्वस्त्रसज्ज देशांदरम्यान शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व उपलब्ध राजनयिक साधनांचा वापर करा. चर्चेद्वारे भारतासोबतचा तणाव कमी करण्यावर काम करा असे नवाज यांनी शाहबाज यांना सांगितले आहे.