मनोरुग्णांची मानसिकता ओळखणे गरजेचे
डॉ. देविका गस्ती यांचे मार्गदर्शन : मनोऊग्णांसाठी ‘नयी दिशा’ कार्यशाळेचे उद्घाटन
बेळगाव : मनोरुग्णांची मानसिकता ओळखून त्यांच्या घरच्यांनी योग्य उपचार चालू ठेवल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. कुणीतरी काळी जादू केली आहे म्हणून अंधश्र्रद्धेच्या आहारी जाऊन लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले असल्याचे मत राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉ. देविका गस्ती यांनी मांडले. संजीवीनी फौंडेशनच्यावतीने मनोरुग्णांसाठी आयोजित ‘नयी दिशा’ या एक दिवसीय कार्यशाळेच्या उदघाटन समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा रुग्णालयाचे मनोरुग्ण विभागप्रमुख डॉ. टी. आर. चंद्रशेखर, डॉ. देविका गस्ती, संस्थेचे सीईओ मदन बामणे आणि संस्थापिका डॉ. सविता देगिनाळ उपस्थित होत्या.
सुरुवातीला मदन बामणे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करताना उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यशाळा आयोजित करण्यामागचा उद्देश सांगितला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय संस्थेच्या सल्लागार सदस्या डॉ. सुरेखा पोटे यांनी करून दिला. मदन बामणे आणि सविता देगिनाळ यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी डॉ. चंद्रशेखर म्हणाले की, जुन्या काळात मानसिक रुग्णाला भूतबाधा झाली म्हणून अनेक ठिकाणी मंत्र-तंत्र करणे, झाडाला बांधून ठेवणे, रात्रभर डोक्यावर दिवा ठेवणे अशा प्रकारचे अघोरी प्रकार करत असत. असे करत असताना तामिळनाडूमध्ये पंचवीसहून अधिक लोक भाजून मृत्युमुखी पडल्याची घटना घडल्यानंतर सरकारने मेंटल हेल्थ केअर कायदा तयार केला. तेव्हापासून रुग्णांची हेळसांड थांबली असली तरी त्यांचे नातेवाईक परिस्थितीचा स्वीकार करताना दिसत नसल्याची खंत डॉ. चंद्रशेखर टी. आर. यांनी व्यक्त केली.
डॉ. सविता देगिनाळ यांनी संजीवीनी मनोरुग्ण पुनर्वसन केंद्र सुरू करण्यामागचा उद्देश सांगितला. फक्त औषधोपचारच करून रुग्ण बरे होत नसतात तर त्यासोबत त्यांचे पुनवर्सन होणे गरजेचे असते, असे सांगून संस्थेतील कामकाजाची व उपचाराची माहिती दिली. दिवसभर मनोरुग्णांसाठी व्यावसायिक थेरपीच्या माध्यमातून कँडल होल्डर आणि फोटो फ्रेम करवून घेतल्या गेल्या. दुपारच्या सत्रात आहारतज्ञ प्रियांका राठोड यांनी निरोगी, आरोग्य आणि आहारा याबद्दल माहिती दिली. यानंतर विविध खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले. कार्यशाळेसाठी ‘नयी उमंग’च्या युवा सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी नेवगिरी तर आभार पद्मा औशेकर यांनी मानले.