वाढत्या तणावामुळे ‘आयपीएल’ स्थगित
उर्वरित सामने एका आठवड्यासाठी स्थगित, नवीन वेळापत्रक व ठिकाणे योग्य वेळी जाहीर करणार
वृत्तसंस्था/ दिल्ली
भारत व पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चालू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 चे उर्वरित सामने तत्काळ एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे बीसीसीआयकडून कळविण्यात आले आहे.
संबंधित अधिकारिणी आणि घटकांशी सल्लामसलत करून परिस्थितीचे व्यापक मूल्यांकन केल्यानंतर स्पर्धेचे नवीन वेळापत्रक आणि ठिकाणांबाबत पुढील माहिती योग्य वेळी जाहीर केली जाईल. बहुतेक संघांनी त्यांच्या खेळाडूंच्या चिंता आणि भावना कळविल्या होत्या. त्यांचा विचार करून तसेच ब्रॉडकास्टर, प्रायोजक व चाहत्यांचे मत जाणून घेतल्यानंतर आणि सर्व प्रमुख घटकांशी योग्य सल्लामसलत केल्यानंतर आयपीएल कार्यकारी मंडळाने हा निर्णय घेतला आहे. आपल्या सशस्त्र दलांच्या ताकदीवर आणि तयारीवर पूर्ण विश्वास ठेवत असताना मंडळाने सर्व घटकांच्या सामूहिक हिताचा विचार करून पाऊल टाकणे शहाणपणाचे मानले आहे.
‘या महत्त्वाच्या टप्प्यावर बीसीसीआय देशासोबत ठामपणे उभा आहे. आम्ही भारत सरकार, सशस्त्र दल आणि आपल्या देशातील लोकांसोबत उभे आहोत. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत देशाचे रक्षण करणाऱ्या आणि प्रेरणा देणाऱ्या सशस्त्र दलांच्या शौर्याला मंडळ सलाम करतो. कारण ते अलीकडच्या दहशतवादी हल्ल्याला आणि पाकिस्तानच्या सशस्त्र दलांनी केलेल्या अनपेक्षित आक्रमणाला जोरदार उत्तर देत आहेत’, असे मंडळाच्या निवेदनात म्हटले आहे.
क्रिकेट हा राष्ट्रीय उत्साहाचा विषय असला, तरी राष्ट्र आणि आपल्या देशाची सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षिततेपेक्षा मोठे काहीही नाही. भारताचे रक्षण करण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देण्यास बीसीसीआय वचनबद्ध आहे आणि नेहमीच आपले निर्णय राष्ट्राच्या हिताशी सुसंगत ठेवेल, असे मंडळाच्या निवेदनात म्हटले आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (एचपीसीए) स्टेडियमवरील पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील गुऊवार रात्रीचा बहुप्रतिक्षित सामना रद्द करण्यात आला होता. त्यानंतर ही घडामोड घडली आहे. आयपीएल अंतिम टप्प्यात पोहोचली असून मूळ वेळापत्रकानुसार 25 मे रोजी अंतिम सामना व्हायचा आहे.