For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रवांडाकडून बेळगावातील गुंतवणूकदारांना आमंत्रण

12:14 PM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
रवांडाकडून बेळगावातील गुंतवणूकदारांना आमंत्रण
Advertisement

सहा तासात व्यवसाय परवान्याची हमी : उद्योग-धंद्यांसाठी पोषक वातावरण : लाभ घेण्याचे आवाहन

Advertisement

बेळगाव : रवांडा देशामध्ये कृषी, आरोग्य, शिक्षण, खाण आणि इंधन यासह मूलभूत सुविधा पुरविणाऱ्या विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यास मोठ्या प्रमाणात संधी आहे. उद्योजकांनी आणि भांडवलदारांनी गुंतवणूक करावी. उद्योगस्नेही वातावरण असून या ठिकाणी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. गुंतवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचे मुक्त स्वागत आहे, असे आफ्रिका खंडातील रवांडा देशाच्या हायकमिशनर  जॅक्वेलिन मुकनजिरा यांनी सांगितले.

येथील एका खासगी हॉटेलमध्ये स्थानिक उद्योजक व भांडवलदारांच्या आयोजित बैठकीमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, आमदार राजू सेठ, जि. पं. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांच्यासह शहरातील उद्योजक, व्यावसायिक, गुंतवणूकदार उपस्थित होते. त्या पुढे म्हणाल्या, आफ्रिका खंडातील रवांडा देश ई-कॉमर्स, ई-सर्व्हिस यासह विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत. देशात भ्रष्टाचाराला थारा नाही. व्यापार, उद्योजक यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरविण्यावर भर दिला जात आहे. त्यादृष्टीने कर आकारणी केली जात आहे. पारदर्शक आणि सुरक्षितता यांची हमी आहे.

Advertisement

केवळ सहा तासात आवश्यक परवाने उपलब्ध

गेल्या अकरा वर्षांपासून देश प्रगतीपथावर आहे. उद्योग सुरू करण्यासाठी केवळ सहा तासात आवश्यक परवाने उपलब्ध करून दिले जातात. आफ्रिकेमध्ये गुंतवणूक करण्यास उद्योजकांना एक उत्तम संधी आहे. इंटरनेट सुविधा, वीज, पिण्याचे पाणी, रस्ते या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. देशामध्ये महिला सबलीकरणाला प्राधान्य देऊन लिंगभेद दूर करण्यात आला आहे. त्यामुळेच 50 टक्के महिला खासदार झाल्या आहेत. शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

इंडियन स्पोर्ट्स स्कूल रवांडामध्ये

यावेळी बोलताना जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, या देशाचा चार वेळा दौरा केला आहे. तेथील वातावरण गुंतवणूकदारांसाठी उत्तम आहे. सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी इंडियन स्पोर्ट्स स्कूल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी जागेची पाहणी करण्यात आली आहे. तेथील लोक अधिक आरोग्यपूर्ण असल्याने आंतरराष्ट्रीय क्रीडापटू तयार करण्यास उत्तम संधी आहे. यासाठी हे स्कूल सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिला सबलीकरणाला प्राधान्य देण्यात आल्याने कायदा व सुव्यवस्था उत्तम दर्जाची आहे. उद्योजकांनी या देशात गुंतवणूक करण्यास पुढे यावे, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.