For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संभाव्य पूरस्थिती परिसराची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

11:30 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
संभाव्य पूरस्थिती परिसराची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
Advertisement

घटप्रभा, कृष्णा, हिरण्यकेशी नदीपात्रांना भेट : अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याची सूचना

Advertisement

बेळगाव : शेजारील महाराष्ट्र राज्यासह जिल्ह्यामध्ये पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी विविध ठिकाणी भेट देऊन संभाव्य पूरस्थितीची पाहणी केली. घटप्रभा, कृष्णा, हिरण्यकेशी या नदी पात्रांना भेट देऊन माहिती जाणून घेतली. सुतगट्टी येथील घटप्रभा नदी पात्रातून वाहणाऱ्या सध्याच्या पाण्याच्या प्रवाहाची माहिती अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. यानंतर संकेश्वरला भेट देऊन संभाव्य पूरस्थिती दरम्यान पुरामध्ये जाणाऱ्या भागाची पाहणी केली. यापूर्वी पूरस्थितीवेळी निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा अधिकाऱ्यांकडून जाणून घेतला. संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची तयारी व हाती घेतल्या जाणाऱ्या उपाययोजना तहसीलदारांकडून व इतर खात्याच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेतल्या. परिस्थितीचा सामना करण्यासाठी सिद्ध राहण्याची सूचनाही त्यांनी केली. सध्या नदीतून वाहणाऱ्या पाण्यामुळे बुडालेल्या पुलांवरून नागरिकांनी वाहतूक करू नये, याठिकाणी बॅरिकेड्स लावून नागरिकांना धोक्याची सूचना द्यावी.

2019 दरम्यान निर्माण झालेल्या पूरस्थितीवेळी ज्याप्रमाणे काळजी केंद्रे उभारली होती, त्याप्रमाणेच आताही काळजी केंद्रे उभारण्यात येतील, यासाठी तयारी करण्यात आली असल्याची माहिती हुक्केरी तहसीलदार मंजुळा नाईक यांनी दिली. चिकोडी तालुक्यातील मांजरी पुलावरून कृष्णा नदीच्या प्रवाहाची पाहणी केली. यानंतर येडूर गावाला भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी बोटीतून कृष्णा नदीमध्ये प्रवास केला. तातडीच्यावेळी नागरिक आणि जनावरांच्या रक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. शेजारील महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. त्यासाठी खबरदारी घेण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. यावेळी चिकोडीचे प्रांताधिकारी सुभाष संपगावी, तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांच्यासह महसूल आणि पाटबंधारे खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

जिल्ह्यामध्ये सध्या पुराची भीती नाही...

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सध्या जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची परिस्थिती नाही. असे असले तरी खबरदारीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. 26 बोटी तयार असून गरज पडल्यास आणखी बोटींची व्यवस्था केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.