मच्छे निराश्रीत केंद्रामध्ये निकृष्ट दर्जाचा आहार
भीमसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : मच्छे येथील निराश्रीत केंद्रामध्ये असणाऱ्या निराश्रीतांना निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असून, याची तातडीने तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करत युवा कर्नाटक भीमसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. आधार नसलेल्या नागरिकांना आधार देऊन आसरा देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या मच्छे निराश्रीत केंद्रामध्ये जवळपास 140 ते 150 भिक्षुक, मानसिक अस्वस्थ असलेले नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांना देण्यात येणारे जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. बाजारामधून निकृष्ट दर्जाचा आहार व भाजीपाला खरेदी करून जेवण घातले जात आहे. अधिकाऱ्यांच्या गैरकारभारामुळे हा प्रकार सुरू आहे. केंद्राचे अधीक्षक मल्लाप्पा मेगडे यांच्या गैरकारभाराची चौकशी करण्यात यावी. या केंद्रामध्ये कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही धमकी दिली जात आहे. गलथान कारभाराची माहिती दिल्यास सेवेतून कमी केले जाईल, असे धमकावले जात आहे. त्यामुळे हा गैरकारभार उजेडात आलेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अधीक्षक एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत. त्यांची चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली. प्रवेशद्वारात ठाण मांडून बसलेल्या कार्यकर्त्यांनी शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केंद्राला तातडीने भेट देऊन पाहणी करण्यात येईल. चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.