‘इंडी’ आघाडी भ्रष्टाचार, द्वेशविरोधी शक्तींचा तळ; पंतप्रधान नरेंद्र मोदींची टिका
विरोधकांवर शाब्दिक घणाघात : बिहारच्या नवादा येथे जाहीर सभा
► वृत्तसंस्था/ नवादा
इंडी आघाडी म्हणजेच भ्रष्टाचाऱ्यांचा तळ आहे. इंडी आघाडी हे देशविरोधी शक्तींचा तळ आहे. काँग्रेसच्या मनात अत्यंत विष असल्यानेच त्या पक्षातील काही जण राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सामील झाल्यावर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. लवकरच रामनवमी असून काँग्रेसच्या या द्वेषाचा बंधुभगिनींनो विसर पडू देऊ नका असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधील जाहीर सभेला संबोधित करताना आवाहन केले आहे.
इंडी आघाडीकडे व्हिजन तसेच विश्वसनीयता नाही. दिल्लीत जे लोक एकत्र उभे असतात, वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते परस्परांना दुषणं देऊ लागतात. हे लोक केवळ नाईलाजाने एकत्र आले आहेत. ‘सत्तेचा स्वार्थ’ साधण्यासाठी ते एकवटले आहेत असे पंतप्रधान मोदींनी नवादा येथील भाजपचे उमेदवार विवेक ठाकूर यांच्या समर्थनार्थ आयोजित सभेत बोलताना म्हटले आहे.
मोदीच्या गॅरंटीमुळे विरोधकांमध्ये भीती
मोदीच्या गॅरंटी इंडी आघाडीला पसंत पडत नाही. इंडी आघाडीच्या एका मोठ्या नेत्याने मोदीच्या गॅरंटीवर बंदी घालावी असे म्हटले आहे. मोदीने गॅरंटी देणेच बेकायदेशीर असल्याचे हे लोक म्हणत आहेत. मोदीच्या गॅरंटीमुळे हे लोक घाबरून गेले आहेत. मी देशातून गरीबी संपविण्याच्या मिशनमध्ये मग्न आहे. मी देखील गरीबी अनुभवली आहे. गरीबचा पुत्र मोदी हा गरीबांचा सेवक आहे. देशातील प्रत्येक बंधूभगिनीला गरीबीतून बाहेर काढणार नाही तोवर स्वस्थ बसणार नसल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
जगभरात भारताचा उदोउदो
लालकिल्ल्यावरून हीच वेळ असल्याचे मी म्हटले होते. भारतायच इतिहासात अनेक शतकांच्या प्रतीक्षेनंतर ही वेळ आली आहे. आम्ही सर्वांनी मिळून काम केले तर भारत विकसि होऊ शकतो. भारत स्वत:ची गरीबी दूर करू शकतो. आम्ही ही संधी गमावू नये, याचमुळे 2024 मधील ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. आता बिहारमध्ये आधुनिक द्रुतगती मार्ग तयार होत आहेत, रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण होत आहे. वंदे भारतसारख्या रेल्वेंची संख्या वाढत आहे. डिजिटल क्रांतीने सरकारच्या सेवांना लोकांच्या हातातील मोबाइलपर्यंत पोहोचविल्या आहेत. आज पूर्ण जगात भारताची प्रशंसा होत असल्याचे मोदी म्हणाले.
अशा लोकांना बिहार माफ करणार का?
सनातन धर्म संपविणार असल्याचे बोलणाऱ्यांना बिहार माफ करणार का? येथील लोक त्यांना एक तरी मत देणार का? अशा लोकांना सत्तेपासून दूर ठेवणे आवश्क आहे. भारताच्या आणखी एका विभाजनासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. काँग्रेस पक्षाचे नेते दक्षिण भारताला वेगळे करणार असल्याचे जाहीरपणे म्हणत आहेत. काँग्रेसच्या घोषणापत्रावर मुस्लीम लीगच्या विचारांची छाप आहे. काँग्रेसने घोषणापत्र नव्हे तर तुष्टीकरणाचे पत्र जारी केले असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
युवांना नोकरी देऊ : नितीश कुमार
सभेला संबोधित करताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. 2005-20 या कालावधीत आम्ह 8 लाख लोकांना शासकीय नोकरी दिली आहे. पुढील काळात 10 लाख नोकरी-रोजगार देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत आम्ही 10 लाख जणांना शासकीय नोकरी देणार आहोत. आतापर्यंत 4 लाख जणांना नोकरी मिळाली असल्याचा दावा नितीश यांनी केला आहे.