भारताची लोकशाही सामर्थ्यशाली!
‘रायसीना डायलॉग’मध्ये ग्रीक पंतप्रधानांचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांनी बुधवारी नवी दिल्लीतील नवव्या ‘रायसीना डायलॉग’मध्ये बोलताना भारतीय लोकशाहीची जोरदार स्तुती केली. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी आर्थिक शक्ती आहे. प्रभावशाली लोकशाही कोणत्याही देशाला मजबूत आर्थिक वाढ कशी देऊ शकते याचे भारत ज्वलंत उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अलिकडच्या वर्षांत ग्रीसने कोणत्याही युरोपीय देशापेक्षा सर्वात वेगवान विकास दर पाहिला आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये परस्पर गुंतवणूक हा महत्त्वाचा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘रायसीना डायलॉग’ची नववी परिषद 21 फेब्रुवारीपासून दिल्लीत सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी या हाय-प्रोफाईल परिषदेचे उद्घाटन केले. परिषदेच्या उद्घाटन सत्रात ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस हे प्रमुख पाहुणे आहेत. परिषदेत जगभरातील राजकारणी आणि इतर क्षेत्रातील आघाडीचे नेते सहभागी झाले आहेत. जागतिक समुदायासमोरील गंभीर समस्यांवर चर्चा केली जाणार आहे. हा कार्यक्रम 23 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
ग्रीसचे पंतप्रधान मित्सोटाकिस म्हणाले की, भारत आज जगातील सर्वात मोठ्या शक्तींपैकी एक आहे. भारतासोबतची भागिदारी वाढवणे हा युरोपच्या परराष्ट्र धोरणाचा आधारस्तंभ असावा. यावर आम्ही सातत्याने काम करत आहोत. गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांनी आपली भागिदारी पुढे नेण्यासाठी सातत्याने काम केले आहे. आज भारत जागतिक स्तरावर एक महान शक्ती आहे. जगातील शांतता आणि सुरक्षिततेसाठी हा एक महत्त्वाचा सहयोगी आहे. जी-20 देशांमध्ये भारत ही एक उदयोन्मुख शक्ती असून हवामान बदलाविरूद्धच्या लढाईत एक प्रमुख देश असल्याचेही नमूद केले.
भारत आणि ग्रीस लोकशाहीला अडथळा म्हणून न पाहता संधी म्हणून पाहतात. दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक आणि सामरिकदृष्ट्या बरेच साम्य आहे. अशा स्थितीत भारत आणि युरोपमधील संवादाचे माध्यम म्हणून आपण काम करू शकतो. डेटा आणि उर्जेसाठी भारत-ग्रीस नवीन प्रकल्पांवर काम करत आहेत. इंडिया मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉर हे भारत, मध्य पूर्व आणि युरोपच्या वाढत्या अर्थव्यवस्थांमधील कनेक्टिव्हिटीचे एक उत्कृष्ट माध्यम असेल. या कॉरिडॉरच्या मध्यभागी ग्रीस आहे. आम्ही भारतासाठी युरोपमध्ये प्रवेश करण्याचे मुख्य द्वार आहोत, असेही मित्सोटाकिस यांनी स्पष्ट केले.
भारत आणि ग्रीस या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये परस्पर गुंतवणूक हा महत्त्वाचा उद्देश आहे. भारतातील अनेक क्षेत्रात ग्रीक गुंतवणूक वाढली आहे. यामध्ये सागरी, हवाई वाहतूक आणि रसद यांचा समावेश आहे. अन्न प्रक्रिया, सागरी आणि हवाई वाहतूक, लॉजिस्टिक यासह अनेक क्षेत्रांमध्ये भारतात आधीच ग्रीसची मोठी गुंतवणूक आहे. नुकत्याच झालेल्या भारतीय पंतप्रधान मोदींसोबतच्या संभाषणात आम्ही 2030 पर्यंत दोन्ही देशांमधील व्यापार दुप्पट करण्यावर सहमती दर्शवल्याचेही त्यांनी आपल्या संवादात सांगितले.
‘रायसीना डायलॉग’चे महत्त्व...
‘रायसीना डायलॉग’ ही राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आयोजित वार्षिक परिषद आहे. ही भू-राजकारण आणि भू-अर्थशास्त्रावरील भारताची प्रमुख परिषद असून जागतिक समुदायासमोरील सर्वात आव्हानात्मक समस्यांचे निराकरण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. ‘रायसीना डायलॉग’ची सुऊवात 2016 मध्ये झाली होती. दरवषी, राजकारण, व्यवसाय, मीडिया आणि नागरी समाजातील नेते नवी दिल्लीत एकत्र येतात. यावेळी ते जगातील परिस्थितीवर चर्चा करतात आणि समकालीन विषयांवर सहकार्याच्या संधी शोधतात. देशांचे प्रमुख, पॅबिनेट मंत्री आणि स्थानिक सरकारी अधिकारी या संवादात सहभागी होतात. याशिवाय खासगी क्षेत्रातील विचारवंत, प्रसारमाध्यमे आणि शिक्षण विश्वातील विचारवंतही या कार्यक्रमात सामील होतात. ही परिषद भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनने आयोजित केली आहे. याला अनेक संस्था, कंपन्या आणि व्यक्तींचे सहकार्यही मिळते. ‘रायसीना डायलॉग’ची नववी आवृत्ती 21-23 फेब्रुवारी 2024 दरम्यान सुरू आहे.