भारताचे कौतुकास्पद धाडस : मुख्यमंत्री
तिन्ही सैन्यदलांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन
पणजी : ऑपरेशन ‘सिंदूर’ च्या माध्यमातून भारतीय सेनेने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. असा धाडसी निर्णय घेऊन या हल्ल्यासाठी सेनेला पूर्ण स्वातंत्र्य देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन आणि त्यांना सलाम, अशा शब्दात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आनंद व्यक्त केला आणि पंतप्रधानांचे कौतुक केले. बुधवारी सायंकाळी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पर्वरी सचिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी, पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांच्या हत्येचा भारताने सूड उगवला आहे, असे सांगितले. या हल्ल्यानंतर 15 दिवसांनी अत्यंत योजनाबद्धरित्या आणि शत्रू राष्ट्राला पूर्ण गाफिल ठेवत भारतीय सेनेने केलेल्या या कृतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बळकट बनत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे नऊ प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त केले आहेत, त्यामुळे दहशतवादाला आश्रय देणाऱ्या त्या देशाला कठोर शिक्षा मिळाली आहे. भारत आपल्या भूमीवर कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कारवाया सहन करणार नाही हेच पंतप्रधानांच्या निर्णायक नेतृत्वाने सिद्ध केले आहे, असे ते म्हणाले. भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर गोव्यासह देशभरातील एकूण 244 जिह्यांमध्ये ‘अतिदक्षतेचे’ आदेश देण्यात आले आहेत. राज्यात दोन्ही जिह्यांमध्ये पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. त्याशिवाय राजधानी शहर, वास्कोतील एमपीटी, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, तसेच दोन्ही विमानतळे आदी ठिकाणीही चोख पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने संपूर्ण देशासह गोव्यातही मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले असून त्याचाच भाग म्हणून रात्री संपूर्ण वीजपुरवठाही खंडित केला जाऊ शकतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शिरगांव : सत्यशोधन समिती आज देणार अहवाल
दरम्यान, शिरगांव येथे देवी श्रीलईराई जत्रोत्सव काळात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे सहा जणांना प्राण गमवावे लागले होते. या हृदयद्रावक घटनेबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत दु:ख व्यक्त करण्यात आले. तसेच मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक मिनिट स्तब्धता पाळण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. शिरगावातील या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारतर्फे सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीकडून आज गुऊवारी आपला अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर दुर्घटनेचे खरे कारण स्पष्ट होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.