भारतीय महिलांनी द. आफ्रिकेला दाखवले आस्मान
द. आफ्रिकेचा 50 गुणांनी धुव्वा : जेतेपदासाठी नेपाळचे आव्हान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खो-खो विश्वचषक 2025 मध्ये भारतीय महिला संघांने उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने कमालीच्या खेळाचे प्रदर्शन केले. त्यामुळे भारताचे अंतिम फेरीत पोहचण्याचे स्वप्न सहज शक्य झाले. पहिल्या डावातच भारताने आपले इरादे दाखवून देत प्रतिस्पर्धी द. आफ्रिकेला सळो की पळो करून सोडले. या सामन्यात दोन्ही डावात भारताने प्रत्येकी 5 असे 10 ड्रीम रन गुण मिळवत द. आफ्रिकेला धक्का दिला. भारताने हा सामना 66-16 (मध्यंतर 33-10) असा 50 गुणांनी जिकला. आता भारतीय महिला संघ रविवारी, 19 रोजी नेपाळविरुद्ध अंतिम लढतीसाठी मैदानात उतरणार आहे.
भारतीय संघाने सामन्याला दमदार सुरुवात केली. चैत्रा बी. यांच्या अद्वितीय ड्रीम रन मुळे संघाने पहिल्याच टप्प्यात मजबूत पकड मिळवली. नाझिया बिबी आणि निर्मला भाटी यांना आफ्रिकेच्या बचावपटूंनी टिपल्यानंतरही चैत्राने एकटीने 5 गुण मिळवले. मात्र, अखेर सिनेतेंबा मोसिया यांनी तिला बाद केले. या ड्रीम रनने भारताने दक्षिण आफ्रिकेच्या 8 गुणांच्या जवळ जाण्याची तयारी केली. दुसऱ्या टर्नमध्ये रेश्मा राठोडने आघाडी घेत दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना बाद करण्यात मोठी कामगिरी केली. त्यांची ही कामगिरी संघासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. या टर्ननंतर भारतीय संघ 33-10 अशा आघाडीवर होता.
तिसऱ्या टर्नमध्ये भारतीय महिला संघाने पुन्हा एकदा ड्रीम रन साकारला. वैष्णवी पवार, नसरीन शेख, आणि भिलरदेवी यांनी सलग 5 मिनिटे मैदानावर उत्कृष्ट खेळ करत 5 गुण मिळवले. या टर्ननंतर स्कोअर 38-16 असा झाला, ज्यामुळे अंतिम सात मिनिटांमध्ये भारतीय संघाची पकड मजबूत झाली. दक्षिण आफ्रिकन संघाच्या तुकड्यांनी चौथ्या टर्नमध्ये केवळ 1 मिनिट 45 सेकंद टिकाव धरला. नसरीन शेख (2.05 मि. 8 गुण) आणि रेश्मा राठोड (6 गुण) यांनी शानदार खेळ करत सामना भारताच्या बाजूने 66-16 असा संपवला.