भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल
वृत्तसंस्था / लंडन
पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाचे शनिवारी इंग्लंडमध्ये आगमन झाले. सदर कसोटी मालिका 2025-27 च्या आयसीसी विश्वकसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत राहिल.
रोहीत शर्मा आणि विराट कोहली यांनी गेल्या महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय क्रिकेट निवड समितीने सलामीचा फलंदाज शुभमन गिलकडे कसोटी कर्णधाराची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला. गिलच्या कसोटी कर्णधाराच्या मोहीमेला इंग्लंडमध्ये प्रारंभ होणार असल्याने त्याची सत्वपरीक्षा ठरेल. शुक्रवारी रात्री भारतीय संघ मुंबईतून लंडनकडे रवाना झाला होता.
उभय संघामध्ये ही कसोटी मालिका निश्चितच चुरशीची होईल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. दरम्यान भारतीय संघातील नवोदित क्रिकेटपटूंना इंग्लंडमधील खेळपट्ट्या आणि वातारण यांच्याशी जुळवून घेताना थोडे अवघड जाईल. नवोदित साई सुदर्शन याच्या कामगिरीकडे विशेष लक्ष राहिल. कारण त्याने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. उभय संघातील पहिली कसोटी 20 जूनला लिड्स मैदानावर होणार आहे. त्यानंतर दुसरी कसोटी 2 ते 6 जुलै दरम्यान बर्मिंगहॅम येथे, तिसरी कसोटी लॉड्स मैदानावर 10 ते 14 जुलै दरम्यान, चौथी कसोटी मँचेस्टर येथे 23 ते 27 जुलै दरम्यान आणि शेवटची कसोटी 4 ते 8 ऑगस्ट दरम्यान ओव्हल मैदानावर होणार आहे.