भारतीय अर्थव्यवस्थेची पुन्हा जोमाने उसळी
केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे उद्गार
मडगाव : केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी रविवारी सांगितले की, कोविड-19 च्या ताज्या लाटेबद्दल नागरिकांनी आणि पर्यटन उद्योगाने काळजी करण्याची गरज नाही. कारण देशाने यापूर्वी या महामारीशी लढा दिलेला आहे. केंद्र सरकारच्या प्रगतशील धोरणांमुळे कोव्हिड-19 महामारीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेने पुन्हा उसळी घेतली आहे. दक्षिण गोव्यात ‘पांचजन्य’ साप्ताहिकाने आयोजित केलेल्या ‘सागर मंथन 2.0’ या कार्यक्रमात नाईक बोलत होते. उद्रेक झाल्यास देशात आणखी एक लॉकडाऊन होईल का, असे विचारले असता नाईक म्हणाले की, घाबरण्याची गरज नाही. कोविड महामारी पुन्हा उद्भवली, तरी आम्ही त्याच्याशी लढू शकतो. आम्ही यापूर्वीही लढलो आहोत. रविवारी आलेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात एका दिवसात 656 नवीन कोविड-19 रुग्णांची भर पडलेली असून सक्रिय रुग्णांची संख्या 3,742 वर पोहोचली आहे. भारतात 21 डिसेंबरपर्यंत ‘जेएन-1’ कोविड प्रकाराची 22 प्रकरणे नोंदवली गेली असून त्यापैकी 21 गोव्यात आणि एक केरळमध्ये आढळून आलेले आहे. नाईक पुढे म्हणाले की, केंद्र सरकारच्या प्रगतशील धोरणांमुळे कोव्हिड-19 महामारीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेने पुन्हा उसळी घेतली आहे. केंद्राच्या धोरणांमुळे पर्यटन क्षेत्राला पारंपरिक विभागांच्या पलीकडे जाण्यास मदत झाली आहे आणि स्थानिकांसाठी रोजगाराचे नवीन मार्ग निर्माण झाले आहेत, असे ते म्हणाले. केंद्राच्या ‘होम स्टे’बाबतच्या धोरणामुळे रोजगारनिर्मितीस मदत झाली आहे आणि पर्यटनाला परंपरागत विभागांच्या पलीकडे त्याने नेले आहे, असे ते म्हणाले. गोव्याचे पर्यटन खाते समुद्रकिनाऱ्यांच्या पलीकडचे आदरातिथ्य या संकल्पनेवर काम करत आहे, याकडे नाईक यांनी यावेळी लक्ष वेधले.