भारतीय क्रिकेट संघ लंकेला रवाना
वृत्तसंस्था/मुंबई
भारतीय क्रिकेट संघ आगामी वनडे आणि टी-20 मालिकेसाठी सोमवारी लंकेला रवाना झाला. लंकेच्या या दौऱ्यात तीन टी-20 तसेच तीन वनडे सामने खेळविले जाणार आहेत. या दौऱ्यात प्रथमच भारतीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षक पदाची सुत्रे गौतम गंभीर हाताळणार आहेत.
या दौऱ्यात टी-20 मालिकेतील सामने 27, 28 आणि 30 जुलै रोजी होतील. तर त्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका 1 ऑगस्टपासून सुरू होईल. टी-20 मालिकेतील सर्व सामने पल्लिकेलीच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर तर वनडे मालिकेतील सामने आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळविले जाणार आहे. या दौऱ्यामध्ये नवोदित आणि अनुभवी खेळाडुंचे मिश्रण असलेला भारतीय संघ दर्जेदार कामगिरी करेल, असा विश्वास नवे प्रशिक्षक गौतम गंभीरने सोमवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. माजी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि रवी शास्त्राr यांच्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीमध्ये भारतीय संघाने चांगले यश मिळविले होते. आता ही यशाची परंपरा यापुढेही कायम राहिल, असेही गंभीरने म्हटले आहे. गेल्या वर्षी झालेल्या आयसीसीच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला आपण भविष्यकाळात जगातील एक यशस्वी संघ म्हणून नावारुपास आणण्याचा प्रयत्न करेन, असेही गंभीरने म्हटले आहे. या दौऱ्यामध्ये प्रशिक्षक गौतम गंभीरला अभिषेक नायर हे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहतील. त्याच प्रमाणे भारतीय संघाच्या प्रशिक्षकवर्गामध्ये आता डुश्चेटी दाखल झाले आहेत. अभिषेक नायरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत तीन वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले. तसेच त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून खेळताना आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर मुंबईला अनेकवेळा रणजीकरंडक जिंकून दिला आहे.