2050 पर्यंत भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत पुढील दशकात 10 टक्के विकास दर गाठू शकतो, असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) डेप्युटी गव्हर्नर मायकेल देबब्रत पात्रा यांनी म्हटले आहे. भारत आपल्या ऊर्जा आणि बदलांच्या माध्यमातून आव्हानांवर मात करत आहे. अशा स्थितीत भारत 2032 पर्यंत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि 2050 पर्यंत सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकते असा दावाही पात्रा यांनी यावेळी केला आहे.
जपानमधील क्योटो येथे नोमुराच्या 40व्या ‘सेंट्रल बँकर्स सेमिनार‘मध्ये ‘भारतीय अर्थव्यवस्था: संधी आणि आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, ‘भारताच्या अलीकडच्या वाढीच्या कामगिरीने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे.’ उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) ने एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान 2023 साठीचा अंदाज 0.8 टक्क्यांनी वाढवला आहे.
आयएमएफची अपेक्षा आहे की, भारताने जागतिक वाढीमध्ये 16 टक्के योगदान द्यावे, जो बाजार विनिमय दरांच्या बाबतीत जगातील दुसरा सर्वात मोठा वाटा आहे. यानुसार, भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि येत्या दशकात जर्मनी आणि जपानला मागे टाकण्याच्या तयारीत आहे. परचेसिंग पॉवर पॅरिटी (पीपीपी) अटींमध्ये भारतीय अर्थव्यवस्था आधीच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.