काँक्रिटच्या जंगलात रुपांतरित होतोय भारत
इस्रोच्या रिमोट सेंसिंग सेंटरचा अहवाल
मागील 17 वर्षांमध्ये आमचा देश काँक्रिटच्या जंगलात रुपांतरित झाला आहे. 2005-23 पर्यंत देशात कंन्स्ट्रक्शन एरिया 25 लाख हेक्टरने वाढला आहे. यासंबंधीची माहिती इस्रोच्या हैदराबाद येथील नॅशनल रिमोट सेंसिंग सेंटरने दिली आहे. यातून देशात इतक्या वर्षांमध्ये शहरीकरण आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.
एनआरएससीच्या वार्षिक अहवालात भूमी वापर आणि भूमी व्याप्तीमध्ये 2005-06 पासून 2022-23 दरम्यान सुमारे 31 टक्क्यांची वाढ झाल्याचे नमूद आहे. तर यादरम्यान 35 टक्के कंन्स्ट्रक्शन एरियाची यात भर पडली आहे. लँड कव्हरमध्ये सुमारे 2.4 टक्क्यांची वाढ झाल आहे. या कंन्स्ट्रक्शन एरियात केवळ इमारती नव्हे तर रस्त्यांचाही समावेश आहे.
2005-23 दरम्यान गुजरातमध्ये 175 टक्के, कर्नाटकात 109 टक्के, आंध्रप्रदेशात 94 टक्के, मध्यप्रदेशात 75 टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये 58 टक्क्यांनी राष्ट्रीय महामार्ग वाढले आहेत. अहवालानुसार कृषी भूमीतही कंन्स्ट्रक्शन एरिया सामावला गेला आहे. एनआरएससीनुसार कंन्स्ट्रक्शन एरियामध्ये इमारती म्हणजेच छत असलेल्या संरचना, पक्के रस्ते आणि पार्किंग, व्यावसायिक आणि औद्योगिक स्थळ म्हणजेच बंदर, लँडफिल, खाणी, धावपट्टी आणि शहरी हिरवाईयुक्त क्षेत्रांमधील उद्यानांचा समावेश होतो. याचाच अर्थ देशात वेगाने पायाभूत सुविधांचा विकास होत आहे.
परंतु कंन्स्ट्रक्शन एरियात वाढ होणे कृषी भूमीसाठी नुकसानदायक आहे. विकासकामांकरता मोठ्या प्रमाणात भूमीचा वापर होतो, यातून कृषीयोग्य क्षेत्राचा आकार कमी होत चालला आहे. तर दुसरीकडे पुरेशी भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांची निदर्शने होत आहेत. अनेक महामार्गांना विरोध होत असल्याने त्यांचे काम मंदावले आहे.