भारत कधीही हल्ला करू शकतो!
संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भीती : पाकिस्तानात हाय अलर्ट
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान सरकार घाबरले आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी भारत कधीही हल्ला करू शकतो, अशी भीती व्यक्त करतानाच आपल्या सैन्याला पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आल्याचेही स्पष्ट केले आहे. सद्यस्थितीत काही राजनैतिक निर्णय घ्यावे लागत असून ते वेळोवेळ घेतले जात आहेत, असेही ते म्हणाले.
पाकिस्तानी लष्कराने भारताच्या हल्ल्याच्या शक्यतेबद्दल सरकारला माहिती दिली आहे. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाने अलर्ट जारी करत योग्य पावले उचलल्याचे समजते. पाकिस्तान पूर्णपणे सतर्क आहे. जर आमच्या अस्तित्वाला थेट धोका असेल तरच आम्ही आमच्या अण्वस्त्रांचा वापर करू, असे ख्वाजा आसिफ म्हणाले. यापूर्वी, सिंधू पाणी करारावरील भारताच्या निर्णयाची भीती बाळगून ख्वाजा आसिफ यांनी भारत पाण्याचा वापर शस्त्र म्हणून करत असल्याचे वक्तव्य केले होते.