राज्य मार्गावर प्लास्टिक कचऱ्यात वाढ
कोल्हापूर / अवधुत शिंदे :
शहरात तसेच उपनगरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचऱ्यामध्ये प्लास्टिकचे प्रमाण वाढत चालले आहे. कोल्हापूर- रत्नागिरी राज्य महामार्गावरील शिवाजी पूल हा नेहमीच वाहतुकीच्या दृष्टीने गजबजलेला असतो. या मार्गावरुन जोतिबा आणि पन्हाळा किल्ल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांची वर्दळ असते. कोल्हापूर पंचगंगा स्मशानभूमी येथून पूल ओलांडल्यावर वडणगे, आंबेवाडी चिखली ही गावे लागते. या रस्त्यावर हॉटेलची संख्या अधिक असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचऱ्याचे साम्राज्य आहे. यामुळे प्रदूषणाच्या प्रमाणत वाढ होत आहे.
या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना आणि पर्यटकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. रस्त्याकडेला कचरा, प्लास्टिकच्या बॉटल, खराब अन्न टाकलेले असते. पावसाळ्यामध्ये तेथे पाणी साचून तो कचरा खराब होतो, कूजतो आणि त्यापासून परिसरात डासांची निर्मिती होते. आजारांचा फैलाव वाढतो. कचरा कूजल्याने ही स्थिती आरोग्याच्या दृष्टेने नव्हे तर वडणगे, चिखली, आंबेवाडी गावाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने कचऱ्याचे ढीग वाढत चालले आहेत. यामध्ये सर्वात जास्त प्लास्टीकचे प्रमाण आहे. प्लास्टीक कचऱ्यामुळे निसर्गावर तसेच मानवी जीवणावर परिणाम होत आहेत.
- ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
या ठिकाणच्या परिसरात नियमितपणे कचरा टाकला जातो. यावर ग्रामपंचायतांकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. या परिसरात कचरा कुंड्या नाहीत तसेच कचरा उठावाची गाडी नियमितपणे येत नाही. पावसाळ्यात उघड्यावर कचरा पडत असल्याने आजारांचे प्रमाण वाढण्याचा धोका अधिक आहे. ग्रामपंचायतीने या भागात कचरा व्यवस्थापनासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
- पुराचे पाणी आणि कचरा
पावसाळ्यामध्ये पूर आल्याने हा कचरा तसाच पुराच्या पाण्यामध्ये मिसळतो. पुराचे पाणी शहरात तसेच आजुबाजूच्या गावांमध्ये जाते. यामुळे हा कचरा पाण्यामधून ज्या ठिकाणी जातो त्याच ठिकाणी साचतो. वडणगे, चिखली आंबेवाडी गावाशेजारी शेती जास्त असल्याने पूर आल्याने हा कचरा शेतामध्ये जाऊन साचतो. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते.
- कचरा उठावाची व्यवस्था करावी
वडणगे, आंबेवाडी, चिखली येथील परिसरात नियमितपणे कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतने व्यवस्था करावी. तसेच रोज येथून कचरा संकलित करण्यासाठी एक कचरा गाडीची व्यवस्था या भागात करणे आवश्यक आहे.
- ग्रामपंचायतीकडून खालील उपाययोजनांची गरज
प्लास्टिक वापराविरोधात परिसरात जनजागृती
प्लास्टिक धोक्याबाबत पोस्टर प्रदर्शन, पथनाट्या
नियमबाह्य प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई
मोफत कापडी पिशव्या वाटप करावे
सर्वांनी रोज एक संकल्प केला पाहिजे. उपनगरातील प्लस्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:चा कर्तव्य समजून प्लास्टिकमुक्तीसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
तानाजी शिंदे, निसर्गप्रमी
राज्य शासनाने प्लास्टिक बंदी केली आहे. स्थानिक स्वराज संस्थानी याची कडक अंमलबजावणी करणे करजेचे आहे. प्लास्टिक विक्रीवर आळा घालण्यात आला पाहिजे.
स्वप्नाली नाईक, वडणगे, ग्रामपंचायत सदस्य