टिळकवाडी येथे मालवाहू रेल्वे थांबल्याने वाहनचालकांची गैरसोय
20 मिनिटे नागरिक ताटकळत
बेळगाव : टिळकवाडी परिसरात रेल्वे बराच वेळ येऊन थांबण्याचे प्रकार वरचेवर घडत आहेत. रविवारीही सकाळी मालवाहू रेल्वे तब्बल 20 मिनिटे थांबल्याने नागरिकांची गैरसोय झाली. रेल्वेगेटच्या दोन्ही बाजूंनी वाहनचालकांची गर्दी झाली होती. आठवड्यातून किमान एकदा तरी ही समस्या जाणवत असल्यामुळे रेल्वेने सिग्नल यंत्रणेत बदल करण्याची मागणी केली जात आहे. रविवारी सकाळी 10.25 वा. मालवाहू रेल्वे दुसरे रेल्वेगेट परिसरात दाखल झाली. परंतु रेल्वे स्थानकातून सिग्नल न मिळाल्याने रेल्वे टिळकवाडी परिसरातच उभी होती. 20 मिनिटांनी म्हणजेच 10.45 वा. रेल्वे स्थानकातून सिग्नल मिळाल्यानंतर रेल्वे मार्गस्थ झाली. 20 मिनिटे रेल्वेगेट बंद राहिल्याने प्रवाशांची मात्र गैरसोय झाली. साप्ताहिक सुटी असल्याने नोकरदार तसेच शाळकरी विद्यार्थी यांची वर्दळ कमी असली तरी वाहनचालकांची गर्दी होती. रेल्वेस्थानकातून वेळेत सिग्नल न मिळाल्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी रेल्वे थांबविण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना गोगटे ओव्हरब्रिज अथवा तिसरे रेल्वेगेटपर्यंतचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी वाहनचालकांतून केली जात आहे.