For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संततधार पावसामुळे शहरातील व्यवहारांवर परिणाम

11:20 AM Jul 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
संततधार पावसामुळे शहरातील व्यवहारांवर परिणाम
Advertisement

रस्त्यांवर पाणी साचून तलावाचे स्वरुप

Advertisement

प्रतिनिधी / बेळगाव

शहरासह परिसरामध्ये पाऊस संततधार सुरू असून शेतीकामांना वेग आला आहे. तर सततच्या पावसामुळे शहरातील व्यवहार थंडावल्याचे चित्र दिसून आले. एरवी रविवारच्या सुटीला शहरामध्ये गर्दी होत असे. मात्र, संततधार पावसामुळे शहरामध्ये गर्दी दिसून आली नाही. त्यामुळे व्यवहारांवर परिणाम झाल्याचे दिसून आले. तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. रस्त्यांना तलावाचे स्वरुप आले होते.

Advertisement

गेल्या दोन दिवसांपासून सकाळच्या टप्प्यात साधारण पाऊस होऊन दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. मात्र शनिवारी सायंकाळपासून पावसाने सुरू केलेली रिपरिप रविवारी दिवसभर कायम होती. शहरासह परिसरात पाऊस कोसळत असल्याने शहरात नेहमी दिसून येणारी गर्दी निवळली होती. तर ग्रामीण भागातील नागरिक शेतीच्या कामांमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले. सध्या तालुक्यासह परिसरात भात रोप लागवडीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची नितांत गरज आहे. शनिवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतवडीत पाणी साचल्याचे दिसून आले. तर अद्याप मोठ्या पावसाची गरज असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. अपेक्षेनुसार पाऊस झाला नसल्याने नाल्यांना माफक प्रमाणातच पाणी आहे. तालुक्याच्या गावांमध्ये असणारे तलावही अद्याप भरलेले नाहीत. त्यामुळे मोठ्या पावसाची नितांत गरज आहे.

रविवारच्या सुटीच्या दिवशी विशेष करून शहरात बाजारपेठेत खरेदीला येणाऱ्यांची मोठी गर्दी असते. मात्र, सततच्या पावसामुळे नागरिक बाहेर पडले नाहीत. त्यामुळे तुरळक गर्दी दिसून येत होती. भाजीपाला विक्री करण्यासाठी विक्रेत्यांनी गर्दी केली होती. मात्र ग्राहक नसल्याने त्यांनाही उशिरापर्यंत ताटकळत बसावे लागले. सतत पाऊस असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले होते. गांधीनगर येथील सर्व्हिस रस्त्यावर पाणी साचल्याने रस्त्याला तलावाचे स्वरुप आले होते. यामधून दुचाकीसह चारचाकी वाहन घेऊन जाणाऱ्या वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत होती. या रस्त्यावर पाणी साचण्याचा हा प्रकार कायम असून यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यावर मनपाला यश आलेले नाही. या समस्येबाबत अनेकवेळा चर्चा केली जाते मात्र ठोस उपाययोजना राबविल्या जात नसल्याने ही समस्या कायम आहे.

Advertisement
Tags :

.