Satara News : वयगावात 'साठी' पार जोडपी पुन्हा अडकली विवाह बंधनात!
वयगावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विवाहसोहळा
by विजय जाधव
गोडोली : साऱ्या गावभर लग्नाच्या तयारीची लगबग... मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे, अशी भटजींची ओरोळी... साठी' पार केलेले ५ वधू वरांच्या जोड्या..... साध्या कपड्यातचं बाहुल्यावर.. अक्षता सर्वांना मिळाल्या का.... गाईला वासरू सोडलं का... मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा बॅनर अंतरपाट म्हणून धरला... मात्र वधू वरांसह उपस्थितांचा हास्यकल्लोळ... अखेर 'शुभ लग्न सावधान म्हणतं..' आयुष्यात पुन्हा एकमेकांशी त्याच आठवणी जाग्या करणारा विवाह सोहळा वयगाव (वाई) येथे पार पडला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे युवक-युवतींना योग्य जोडीदार शोधण्यात होणारी अडचण, वाढती अपेक्षा, तसेच विवाह संस्थेबाबत निर्माण झालेले गैरसमज या गंभीर विषयांवर प्रकाश टाकण्यासाठी हा सामाजिक अर्थ समजून देणारा लक्षवेधी उपक्रम सामाजिक कार्यकर्त्या रुपाली परिटयांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला. तर सरपंच अश्विनी सुतार, ग्रामपंचायत अधिकारी श्रीदेवी नुले, सदस्यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.
पंचायतराज अभियानांतर्गत सामाजिक अर्थ जनजागृती कार्यक्रम वाई तालुक्यातील वयगाव ग्रामस्थांनी एकात्मतेचा मंत्र जपण्यासाठी आयोजित केला होता. काळानुरूप बदलत असलेल्या विवाह संस्थेचे महत्त्व, नातेसंबंधांचे पूर्वीचे टिकाऊपण, परस्पर समजूतदारपणा आणि कुटुंब मूल्यांची अनिवार्यता यावर हा विवाहसोहळा प्रकाशझोत टाकणारा ठरला. सरपंच अश्विनी सुतार, सदस्यांनी यावेळी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचे पात्र लाभार्थीचे फॉर्म भरण्याची विशेष मोहीम राबवण्यात आली..
यांचा विवाह थाटामाटात
वयगाव गावात सध्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा फिव्हर वाढू लागला आहे. स्पर्धेसाठी सारा गाव एकवटू सक्रिय योगदान देत आहे. निवडक ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा एकवेळ विवाह बंधनाचा तोच अनुभव देण्यासाठी रुपाली परिट यांनी संकल्पना मांडली. सर्वांच्या सहमतीने विठ्ठल कोंडीबा वाडकर आणि कमल विठ्ठल वाडकर, शंकर भैरू वाडकर आणि वेणाबाई शंकर वाडकर, आनंदा सत्तू वाडकर आणि बनाबाई आनंदा वाडकर, रामचंद्र महादेव वाडकर आणि भागाबाई रामचंद्र वाडकर, नामदेव कृष्णा वाडकर आणि सुमल नामदेव वाडकर यांच्या शुभमंगल सावधान म्हणतं विवाहाच्यागाठी पुन्हा अधिक मजबूत केल्या. अभियान काळात लक्षवेधी उपक्रमातून पुढच्या पिढीला सामाजिक संदेश देणारा हा विवाहसोहळा चांगलाच चर्चेत आला आहे.