येत्या निवडणुकीत जनतेने भाजपला योग्य जागा दाखवावी !
सावंतवाडी । प्रतिनिधी
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसलेंची टीका
मंत्री दीपक केसरकर हे १५ वर्षे मतदारसंघाचा विकास करायला कमी पडले त्यामुळे त्यांना आता नारायण राणेंची पाय धरणाची वेळ आली,अशी टीका माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी यावेळी येथे केली . भाजप सरकार हे खोटी आश्वासने व फसव्या योजना राबवून जनतेची दिशाभूल करत आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत त्यांना जनतेने योग्य जागा दाखवावी असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले . खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी तालुक्यात माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या बैठका आयोजित करण्यात आल्या त्यात भोसले बोलत होते .
यावेळी महाविकास आघाडीचे विकास सावंत, जिल्हा प्रमुख संजय पडते, उपनेते जान्हवी सावंत, विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, दिलीप नार्वेकर ,साक्षी वंजारी ,चंद्रकांत गावडे, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, चंद्रकांत कासार, मायकल डिसोझा , तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, रवींद्र म्हापसेकर, समीर वंजारी सहभागी झाले होते . या बैठका कलंबिस्त, कारिवडे ,आरोंदा ,साटेली ,माडखोल आदी ठिकाणी पार पडल्या.
यावेळी जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी खासदार विनायक राऊत हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांना कोणतीही व्यक्ती जाऊन भेटू शकते. मात्र ,नारायण राणेंचे तसे नाही. त्यांना भेटण्यासाठी लोकांना वशिला लावून भेटावे लागते . त्यामुळे खासदार हा सर्वसामान्यांचा असला पाहिजे, ज्याला जनता कधीही भेटू शकते अशी टीका यावेळी पडते यांनी केली .