खानापुरात उष्णतेने गाठला उच्चांक
उष्णतेमुळे नागरिक हैराण, दिवसा उन्हाचे चटके रात्री प्रचंड उकाडा, पाणीटंचाईचीही समस्या
खानापूर : खानापूर शहर परिसरात कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे. परिसराचे तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. या उष्णतेपासून सुटका करून घेण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून शहरात कलिंगड, काकडी तसेच फळांच्या दुकानात आणि शहाळ्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. शहरातील शितपेयांच्या दुकानात रात्री उशिराही गर्दी दिसून येत आहे. तसेच कुल्फी गाड्यांवरही आईस्क्रीमचा स्वाद घेताना नागरिक दिसून येत आहेत. तालुक्यात अलीकडच्या काही वर्षात वातावरणात कमालीचा बदल झाला असून गेल्या काही वर्षापासून थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. खानापूर तालुक्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागात घनदाट जंगले असूनदेखील बदलेलल्या वातावरणामुळे कमालीची उष्णता वाढलेली दिसून येत आहे. यापूर्वी रात्री हवेत गारवा जाणवत होता. मात्र गेल्या दोन वर्षापासून दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री प्रचंड उकाडा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी रात्री उशिरा लोक रस्त्यावरुन शतपावली करताना दिसत आहेत.
उन्हामुळे पाणी स्त्रोतात घट
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रखर उन्हामुळे तपमानात तर वाढच झाली आहे. यामुळे जलस्त्रोतावर फार मोठा परिणाम दिसून येत असून नदी-नाले पूर्णपणे कोरडे पडले आहेत. तर विहिरीच्या पाणीपातळीने तळ गाठला आहे. कूपनलिकांचे पाणी मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. याचा परिणाम सर्वत्र दिसून येत असून अनेक ठिकाणी भीषण पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. तालुक्यात काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर अनेक गावातून शेतातील कूपनलिकांवर पाण्याची भिस्त अवलंबून आहे. नदी-नाले कोरडे पडल्याने पाळीव जनावरांनाही पाण्यासाठी त्रास होत आहे. याचा परिणाम दूध उत्पादनावरही दिसून येत आहे. तसेच या प्रचंड उष्णतेचा परिणाम पिकांवरही झाला आहे.