सद्गुरु महाराजांच्या प्रकृतीत सुधारणा
पणजी : ईशा फाऊंडेशनचे सर्वेसर्वा आणि जागतिक पातळीवरील अध्यात्मगुरु सद्गुरु महाराज यांच्या मेंदूवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. अत्यंत गंभीर परिस्थितीशी गेले चार दिवस झुंज दिल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे वृत्त हाती आले आहे. गेले चार आठवडे त्यांना गंभीर पद्धतीची डोकेदुखी होती. एवढे असून देखील त्यांनी कोईंबतूर येथे आदियोगींच्या प्रतिमेसमोर 8 मार्च रोजी अहोरात्र कार्यक्रमात भाग घेतला. नृत्यही केले. हसतमुखाने जनतेला मार्गदर्शन केले. 15 मार्च रोजी त्यांचे डोके प्रचंड प्रमाणात ठणकू लागले. त्यावेळी ते दिल्लीत पोहोचले हेते. इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर विनीत सुरी यांनी सद्गुरुंची सखोल तपासणी केली. एमआरआय तपासणी तातडीने करण्यात आली. त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्राव सुरू झाल्याचे लक्षात आले. हा रक्तस्राव तीन आठवड्यांपासून चालू असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे हेते. डॉक्टर्सनी त्यांना तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज व्यक्त करून कुठेही जाऊ नका असा सल्ला दिला. असे असताना देखील त्याच दिवशी इंडिया टुडेच्या कनक्लेव्हमध्ये सहभागी होऊन आनंदात मुलाखतही दिली. मात्र डोकेदुखी वाढल्यानंतर दि. 17 मार्च रोजी डॉक्टर्सनी त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेले व त्यांच्यावर फार मोठी शस्त्रक्रिया केली. मात्र रक्तस्राव थांबला नाही. डॉ. विनीत सुरी, डॉ. प्रणव कुमार, डॉ. सुधीर त्यागी व डॉ. एस. चटर्जी या नामवंत न्यूरोसर्जन्सनी शस्त्रक्रिया केली.
सद्गुरुंकडून काळजी न करण्याचा संदेश
आता सद्गुरुंची प्रकृती सुधारत आहे. डॉक्टरांचे उपचार चालू असतानाच सद्गुरुंनी स्वत:च्याही उपचारपद्धती श्वासोच्छवासाद्वारे चालू ठेवलेल्या आहेत. त्यांच्या प्रकृतीत कमालीची सुधारणा झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सद्गुरुंचे जगभरात कोट्यावधी अनुयायी आहेत. ते सध्या काळजीत असले तरी स्वत:च सद्गुरुंनी काळजी करू नका, असा संदेश दिलेला आहे.