कामात सुधारणा करा; अन्यथा जनता धडा शिकवेल
मनपाच्या बैठकीत तीव्र पडसाद : एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना इशारा
बेळगाव : एलअॅण्डटी कंपनीच्या विरोधात जनता संतप्त झाली आहे. एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कामामध्ये सुधारणा करावी, अन्यथा एक दिवस जनताच तुम्हाला धडा शिकवेल, असा इशारा महानगरपालिकेतील सर्वसाधारण बैठकीमध्ये देण्यात आला आहे. या कंपनीच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करा, अशी जोरदार मागणीही नगरसेवकांनी केली आहे. यावेळी अधिकाऱ्यांनी निश्चितच योग्य ते पाऊल उचलू असे सांगितले. पाण्याचे पाईप घालण्यासाठी रस्त्यांवर खोदाई केली जाते. त्यानंतर पाण्याचा पुरवठाही योग्यप्रकारे होत नाही. केवळ बेळगावातच नाही तर इतर जिल्ह्यांमधून या कंपनीबद्दल तक्रारी वाढल्या आहेत. तेव्हा मनपा आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती सूचना करावी आणि कामकाज सुरळीत करण्यास त्यांना सांगावे. अन्यथा एक दिवस जनताच अधिकाऱ्यांना धडा शिकवेल, असेही सुनावण्यात आले आहे.
एलअॅण्डटी कंपनीबाबत गुरुवारी झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण बैठकीत तीव्र पडसाद उमटले. महापौर सविता कांबळे यांच्याकडे या कंपनीविरोधात नगरसेवकांनी तक्रारी केल्या. त्यानंतर महापौरांनी सर्वांनी आपले मते मांडावीत, असे आवाहन केले. त्यानुसार नगरसेवकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. एलअँडटी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही. तक्रारी केल्या तर लवकर त्याचे निवारण केले जात नाही. एकूणच एलअँडटी कंपनीबाबत अनेक जणांच्या तक्रारी आहेत. तेव्हा त्या कंपनीवर योग्य ती कारवाई करण्याचा सूर सभागृहातून उमटला आहे. यावर महापौर सविता कांबळे यांनी मनपा आयुक्तांना योग्य ते पाऊल उचलण्याची सूचना करण्यात आली आहे. यापुढे एलअँडटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना सक्त ताकीद द्यावी. रस्ता करायचा, त्यानंतर तो रस्ता खोदायचा, असे प्रकार सुरू असल्यामुळे जनतेतून तक्रारी वाढल्या आहेत. तेव्हा एलअँडटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना रस्ते खोदाई करताना त्यांच्याकडून योग्य ती नुकसानभरपाई देखील घ्यावी, असे महापौरांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.