युद्धजन्य परिस्थितीचा पर्यटनावर परिणाम
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची माहिती : सुरुवातीच्या चार महिन्यात चांगले पर्यटन
पणजी : गेल्या काही दिवसांपासून भारत - पाकिस्तान तणाव वाढला आणि एकंदरित युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली. त्याचा परिणाम होऊन गोव्यातील पर्यटनास फटका बसल्याची नोंद पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, ही परिस्थिती सुधारण्यासाठी आणि ती पूर्वपदावर यावी म्हणून सर्व ते प्रयत्न करण्यात येणार आहेत. पर्यटन व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली असून त्यांना महत्त्वाच्या सूचना केल्याची माहिती खंवटे यांनी दिली. चालू मे महिन्यात गोवा पर्यटनावर मोठा परिणाम दिसून आल्याचे ते म्हणाले. जानेवारी ते एप्रिल 2025 या चार महिन्यात पर्यटन चांगले झाले. देशी - विदेशी पर्यटक गोव्यात आले, पण मे महिन्यात मात्र पर्यटन घसरले. वर्ष 2024 च्या तुलनेत 2025 वर्षात पाहिल्यास चार महिन्यात पर्यटनसंबंधित चांगला व्यवसाय झाला असून मे महिन्यात तो कमी झाला. त्याचे कारण सर्वांनाच माहीत आहे. आता परिस्थिती सामान्य झाल्यानंतर पुन्हा एकदा गोव्यातील पर्यटन वाढीस लागेल अशी आशा खंवटे यांनी वर्तवली.