‘तो’ धोकादायक खड्डा त्वरित बुजवा
अनगोळ येथील नागरिकांची मागणी
बेळगाव : अनगोळ येथील नाथ पै नगर ते बडमंजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डा पडल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे. या रस्त्यावरुन शेतकरी बैलगाड्यांसह ट्रॅक्टरही ने-आण करतात. त्यामुळे याचा त्रास सहन करावा लागत आहे. तेंव्हा तातडीने तो खड्डा बुजवावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून होत आहे. स्मार्टसिटी अंतर्गत अनगोळमधील विविध रस्ते, गटारी, पदपथाचे काम करण्यात आले आहे. मात्र हे काम दर्जात्मक झाले नसल्याने काही दिवसांतच त्याचा दर्जा उघडा पडत आहे. हा रस्ताही अलिकडेच करण्यात आला होता. मात्र रस्त्याच्या मधोमधच मोठा खड्डा पडल्याने समस्या निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी सीडीवर्कही करण्यात आले असून त्यालाही भगदाड पडले आहे. ते भगदाड अत्यंत धोकादायक आहे. त्यामध्ये लोखंडी बारदेखीलही आहेत, तेंव्हा तातडीने तो खड्डा बुजवावा तसेच सिडीवर्कचीही दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
जनावरांनाही धोका
या रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे जनावरांनाही धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावरुन शेतकऱ्यांचीच मोठी वर्दळ सुरू आहे. त्यामुळे कधी अपघात घडेल, याची शाश्वती नाही. तेंव्हा अपघात घडण्यापूर्वी तातडीने तो खड्डा बुजवावा. अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.