नाच नाचुनी अती मी दमले..
बऱ्याचदा आपली सकाळ गाण्यांनी सुरू होते. एखादा दिवस एखाद्या गाण्याला दिल्यासारखा राहतो. सकाळी रेडिओच्या तंद्रीत म्हणा आणि कशाच्या म्हणा एखादं गाणं मनात घोळायला लागतं आणि काही केल्या ते आपली पाठ सोडत नाही. मग पूर्ण दिवसभर आपल्या मनाला एक चाळाच लागतो. ते गाणं गुणगुणत बसण्याचा, त्याच्यावर विचार करत बसण्याचा, त्यातले शब्द तपासून बघण्याचा, मग अर्थ लावण्याचा! चांगलं गाणं ही आधी एक उत्तम कविता असते. आधी ती कविता असते मग तिचं गाणं होतं. अर्थातच चांगल्या गाण्यासाठी सुरांबरोबरच शब्दांचं महत्त्वही तितकंच असतं. म्हणजे एखादं गाणं जेव्हा खूप चांगली किंवा उत्तम कविता असते, तेव्हा तिला योग्य संगीत मिळालं, योग्य न्याय मिळाला, तर तितकंच उत्तम गाणं घडतं. गाणं घडवण्याचं कसब एखादा दागिना घडवण्याइतकंच जटिल असतं. म्हणूनच त्यासाठी कविता सुद्धा अस्सल बावनकशी सोन्यासारखी असावी लागते. आणि अशी लेखणी असणारे कितीतरी कवी गीतकार आपल्याकडे होऊन गेलेत.
ज्यांनी घडवलेले एक एक गाणं म्हणजे अस्सल बावनकशी सोन्याचे, पाहत राहावेत असे अस्सल मराठमोळे दागिनेच म्हणावे लागतील. असे कितीतरी दागिने आपल्या मायमराठीच्या चरणी ग. दि. माडगूळकर, शांता शेळके, पी.सावळाराम, राजा बढे, आताच्या पिढीतले गुरु ठाकूर, स्वानंद किरकिरे यासारख्या संगीतकारांनी आजपर्यंत अर्पण केलेले आहेत. आकाशवाणीच्या रेडिओ चॅनलचे कार्यक्रम जर आपण पाहिले तर बहुतेक करून पहाटेच्या किंवा सकाळच्या वेळी जुनी गाणी लावण्याची एकंदरीत प्रथा दिसते तसा तो प्रघातच असावा असं वाटतं.
जुन्या गाण्याची गोडी नक्कीच अवीट असते. अशाच काही जुन्या क्लासिकपैकी ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटातलं ‘थकले रे नंदलाला’ हे गीत सकाळी एका रेडिओ चॅनलवर लागलेलं होतं. त्याच्या सुरुवातीचा पीस हा अद्वितीय म्हणावा असाच आहे. आणि त्यानंतरची आशाताईंनी घेतलेली लकेर म्हणजे तर स्वर्गसुखच आहे. ते गाणं लागलं. तीन कडव्यांचा एक एक शब्द म्हणजे हिरामोती असावा इतके सुंदर शब्द घेऊन येणारं हे गाणं पूर्ण झालं तरी पण त्याचं लागलेलं वेड काही माझ्या मनातून जाईना.
ते गाणं प्रत्यक्ष माध्यमांवर एकदा दोनदा वाजत असेल पण आपलं मन हे कुठल्याही माध्यमातून जास्त ताकतीचं माध्यम म्हणावं लागेल. कारण एकसारखं मनात तेच तेच तेच तेच गाणं वाजत राहिलं. आणि त्यातला पुनरुक्तीचा कंटाळा अजिबात आला नाही. उलट एकेका ओळीचा, ओळीतल्या प्रत्येक शब्दाचा, दोन शब्दांमधल्या सहसंबंधांचा विचार करता करता त्या तंद्रीत म्हणजे किती कामं उरकली हे मलाही सांगता येणार नाही. पण त्या गाण्याने पिच्छाच धरला म्हणा ना! गाणं खरं तर एका कलावंतिणीचं व्यक्त होणं आहे. म्हटलं तर देहविक्रय करणाऱ्या स्त्राrचंही असू शकेल. म्हटलं तर आयुष्यात संकटांचा सामना करता करता थकलेल्या स्त्राrचंही म्हणता येईल. आणि अगदी सुंदर आणि सर्वोच्च अर्थ काढायचा झाला तर आधिभौतिक जगाला, संसाराला कंटाळलेल्या आणि मुमुक्षुत्व प्राप्त झालेल्या एका ज्ञानी स्त्राrने परमेश्वराकडे केलेली ती याचनाही म्हणता येईल. कारण ती अन्य कुठल्याही देवाला साद घालत नाही. ती साद घालते ती नंदलालाला. म्हणजेच श्रीकृष्णाला, जो पतितपावन आहे. अनाथांचा नाथ आहे. रस्ता रस्ते फिरून गाणी म्हणून मोबाईलला मिळवणारे एका फिरस्त्या कलावंत बाईचं हे गाणं की रस्त्यावर नाचत नसून मी किती दमले आहे हे त्यातून ती देवाला सांगते.
निलाजरेपण कटीस नेसले
निसुगपणाचा शेला
आत्मस्तुतीचे कुंडल कानी
गर्व जडविला भाला
उपभोगाच्या शतकमलांची कंठी घातली माला
किती सुंदर आणि अर्थवाही शब्द आहेत! दिमडी, भजनी ठेका, याच्या साथीने अप्रतिम असणारी हार्मोनियमची साथ, यात हे शब्द इतके काही खुलून येतात की डोळ्यात पाणी उभं राहतं. लाज राखण्यासाठी म्हणून कमरेला वस्त्र नेसलं जातं आणि ही कमरेला नेसले काय म्हणते? तर निलाजरेपण! शब्द चमत्कृती आणि अर्थवैचित्र्य काय कमाल असेल ना! स्तुती ही कानाने ऐकली जाते. म्हणून ती म्हणते की आपण आत्मस्तुतीचं कुंडल कानात घातलेलं आहे. म्हणजे सततच स्वत:ची स्तुती ऐकून ऐकून मग पुढे त्याचे परिणाम काय होतात तर गर्व जडवीला भाला. आपल्या कपाळी गर्व रेखला जातो. अहंकार प्राप्त होतो. हे किती सुंदर शब्दांतून मांडावं त्याला काही सीमाच नाही. आणि शेवटी कंठी घातलेली माला कशाची? तर उपभोगाच्या शतकमलांची. सतत देहाचा उपभोग घेत राहणे याला कमळाची उपमा दिली. ती कमळाची उपमा मोठी सूचक आहे. ती भोगाचं स्थानसुद्धा अधोरेखित करते इतकी ती महत्त्वाची आहे. ह्या ओळीतून आपल्या लक्षात येतं की हे वेश्येचेही मनोगत आहे. सतत गळ्याशी येणारे उपभोग, त्या वासनामय विळख्यांचा कंटाळा आलेली वेश्या हेच म्हणत असेल ना?
दुसरं कडवं त्याहून मोठं सुंदर आहे. इथे विषयवासना नामक वीणा वाजते आहे असं म्हटलेलं आहे. आणि अतृप्ती ताल धरते आहे. ताल हा तोपर्यंत शिल्लक असतो जोपर्यंत हालचाल असते. जोपर्यंत गती असते. तृप्ती होते त्या क्षणी माणूस थांबतो. त्या क्षणी ठेकाही थांबलेला असतो. हा ठेका आहे आणखी हवं आणखी हवंचा. म्हणून ‘अतृप्ती दे ताला’ मग अनय आणि अनीती हे नूपुर पायात बांधले आहेत. किती म्हणून सुंदर! किती सुंदर! अनय म्हणजे अन्याय अनीती म्हणजे रीत सोडून वागणं. हे नेमके नुपूर म्हणूनच घातलेले आहेत. तर माणूस चुकतो अन्याय करतो तेव्हा त्याचं पाऊल वाकड पडलं असं म्हणतात. म्हणून तो पायातला दागिना दाखवलेला आहे. ‘कुसंगती करताला’ टाळ्या वाजवून दिला जाणारा ताल किंवा तालवाद्य वापरून दिला जाणारा ताल आणि कुसंगती यांचं नातं काय आणि कसं दाखवलेलं आहे, त्याची सांगड कशी आहे ते आपल्याला वेगळे सांगण्याची गरजच नाही. आणि शेवटी ती म्हणते लोभ प्रलोभन नाणी फेकी! पैशाचा मोह कोणाला नसतो? म्हणून लोभ आणि प्रलोभन अधिक पैसा मिळवण्यासाठी वाममार्गाला जाणाऱ्या माणसाला प्रलोभन दाखवूनच त्या मार्गाला नेलं जातं. म्हणून ‘लोभ प्रलोभन नाणी फेकी मजवरी आला गेला’ एक क्षण असा असतो की माणूस थकतो. हेच ते थकणं आहे. आणि शेवटी तिची झालेली अवस्था दाखवली आहे. ज्या वेळेला नको त्या मार्गाला पावलं पडत असतात त्या वेळेलाच त्या मार्गाने जाण्याचे परिणाम तयार झालेले असतात. एकदा उपभोग घेऊन झाले की वाटणीचे भोग हे भोगावेच लागतात. पहिल्यांदा माणूस हौसेने नाचतो, नंतर सवयीने नाचतो आणि नंतर अगतिक होऊन नाचावंच लागतं अशी ही दुर्दैवी कहाणी आहे. हा दुर्दैवी प्रवास असतो.
स्वत:भोवती घेता गिरक्या अंधपणा की आला
तालाचा मज तोल कळेना सादही गोठून गेला
अंधारी मी उभी आंधळी जीव जीवना भ्याला
पहिल्यांदा आत्मस्तुती होते ती ऐकायला बरी वाटते. मग प्रलोभनं दाखवली जातात. त्यामुळे लोकांना माणूस बळी पडतो. पुढे पुढे जात राहतो. एक वेळ अशी येते की स्वत:भोवती गिरक्या घेताना पहिल्यांदा वाटलेली मजा नंतर वाटत नाही. नंतर नंतर तर भोवळ येत राहते पण तोपर्यंत माणसाची कठपुतळी झालेली असते. फिरून फिरून दृष्टी पार निघून गेलेली असते. चांगलं काय वाईट काय काही कळण्याइतकी ताकदच उरलेली नसते. भोवतालच्या जगाचा ताल काय? आपल्या आयुष्याचा ताल काय? आपल्या कुटुंबाचा ठेका काय? हे देखील त्याला कळत नाही. हाक मारली तर सादही देता येत नाही. आणि अंधारात आंधळ्याने उभं असावं तशी परिस्थिती होते. एक अंधार हा खरा असतो आणि दुसरा अंधार त्याने मागून घेतलेला असतो. असे जीवनाला भ्यालेले कितीतरी जीव आपले आयुष्य संपवतात. कारण त्यांची हाक ऐकायला नंदलालाने कुठे कुठे म्हणून धावून यायचं? त्यासाठी हाक सुद्धा द्रौपदी सारखी असावी लागते हो!
-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु