Islampur News : हिंमत असेल तर, काटामारी कारखानदारांवर कारवाई करा - राजू शेट्टी
पुरग्रस्त निधीच्या नावाखाली वसुली करुन राज्यसरकार करतंय दलाली : राजू शेट्टी
इस्लामपूर: इस्लामपूर पुरग्रस्त निधीच्या नावाखाली ऊस उत्पादकाकडून वसुली करुन राज्यसरकार दलाली करत आहे. पुरग्रस्तांना दिलेली ३१ हजार कोटींची मदत फसवी आहे. जर कारखानदार काटामारी करत आहेत, हे मुख्यमंत्र्यांना आधीपासून माहित आहे तर आत्तापर्यंत तुम्ही त्यांना ब्लॅकमेल करत होता काय? असा सवाल करतानाच हिम्मत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी, असा इशारा माजी खा. राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला.
येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १६ रोजी २४ वी उस परिषद जयसिंगपूर येथे होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. यावेळी भागवत जाधव उपस्थित होते.
शेट्टी पुढे म्हणाले, एकरकमी एफआरपी द्यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. आता साखर संघाने सर्व कारखानदारांना एक रकमी एफआरपीचे आदेश द्यावेत. त्यावरील व्याजाची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
खा. शेट्टी म्हणाले, यावर्षी ८५ दिवस गळीत हंगाम सुरू राहिल याची शाश्वती नाही. प्रत्येक कारखानदाराने गाळप क्षमता वाढवली आहे. एकीकडे उस उत्पादकांना देण्यासाठी पैसे नाहीत. तर दुसरीकडे कारखान्याचा विस्तारीकरण कसे सुरू आहे याचे उत्तर द्यावे. राज्यात गोवंश बंदी कायद्यात बदल करावा लागणार आहे.
तसे अध्यादेश काढून भाकड जनावरांचा प्रश्न मार्गी लावाचा, खा शेट्टी पुढे म्हणाले, एआयचा वापर करुन शेतकऱ्यांच्या रिकव्हरी किती ऊसाचे क्षेत्र व त्यातून मिळणारे उत्पादन समजेल. त्यामुळे हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना द्यावे, असे आवाहन केले. तसेच किमान ऑनलाईन काटेतरी करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
काटामारी, रिकव्हरीतून काळा पैसा
कारखानदार काटामारी व रिकव्हरीतून झालेला नफा मिळवण्यासाठी आपल्या बगलबच्चांच्या खात्यावर हा काळा पैसा एंट्री दाखवून जमा करतात. त्यामुळे ५०० टन व त्यापुढील ऊस उत्पादन घेणाऱ्या अशा शेतकऱ्यांची नावे जाहिर करावीत. त्यामुळे त्यांचा सातबारा किती व ऊसाचे उत्पादन घेतात किती हे समजेल, अशी मागणी शेट्टी यांनी केली.
साखर संघाला वर्गणी कशाला...
शेतकऱ्यांना एकरकमी उस बिल मिळण्यासाठी कोर्टात जावे लागते. शेतकऱ्यांच्या विरोधात जर साखर संघ कोर्टात जात असेल तर साखर संघाला शेतकऱ्यांच्या बिलातून निधी घेता येणार नाही. येथून पुढे अशा संघाला वर्गणी देणार नसल्याचे माजी खा. शेट्टी यांनी सांगितले.