For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

26 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे प्रचंड नुकसान

12:10 PM Jul 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
26 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे प्रचंड नुकसान
Advertisement

42 गावांमधील 2450 कुटुंबीयांचे काळजी केंद्रांमध्ये स्थलांतर : 25 ठिकाणी गोशाळांची व्यवस्था

Advertisement

बेळगाव : जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 10.5 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. काही प्रमाणात पावसाने उसंत घेतली असली तरी जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत मात्र कमालीची वाढ झालेली आहे. शेजारील महाराष्ट्रामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे नद्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घटप्रभा, मलप्रभा, कृष्णा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन धोक्याची पातळी गाठली आहे. नद्यांच्या पाण्याचा धोका निर्माण झालेल्या गावांतील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत असून नदीकाठासह परिसरातील 26,674 हेक्टर क्षेत्रातील पिके व 15.29 हेक्टर क्षेत्रातील बागायती पिकांचे नुकसान झाले आहे.

नदीकाठावरील गावांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे संबंधित गावांमध्ये वास्तव्याला असणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अथणी, कागवाड, चिकोडी, निपाणी, गोकाक, मुडलगी, हुक्केरी या तालुक्यातील 42 गावांमधील 2450 कुटुंबीयांचे संरक्षण करून त्यांना काळजी केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. सदर स्थलांतरित नागरिकांची 48 काळजी केंद्रांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. 8698 नागरिक स्थलांतरित झाले आहेत. तर 3833 नागरिक नातेवाईकांकडे वास्तव्यास गेले आहेत. गोकाक तालुक्यामध्ये पुराचा अनेक गावांना फटका बसला असून 13 गावांमधील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

Advertisement

24.89 टन चारा खरेदी 

जिल्हा प्रशासनाकडून जनावरांसाठीही गोशाळा निर्माण करण्यात आल्या आहेत. अथणी, कागवाड, हुक्केरी, गोकाक, मुडलगी, चिकोडी या तालुक्यांमध्ये 25 ठिकाणी गोशाळा उघडण्यात आल्या आहेत. या गोशाळांमध्ये 4861 जनावरे आहेत. त्यांच्यासाठी आतापर्यंत 24.89 टन चारा खरेदी करण्यात आला आहे. 8.89 टन चारा जनावरांसाठी उपयोग करण्यात आला असून 16 टन चारा शिल्लक ठेवण्यात आला आहे. अशाप्रकारे जिल्हा प्रशासनाकडून जनावरांच्या संगोपनासाठी आवश्यक ती व्यवस्था केली आहे.

अनेक पुलांवर पाणी; सदर मार्ग वाहतुकीसाठी बंद

अनेक पुलांवर पाणी आल्याने सदर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. गोकाक, मुडलगी, संकेश्वर, सदलगा, निपाणी, रायबाग, कागवाड, अथणी आदी भागातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पाणी आलेल्या पुलावरील रस्ता वाहतुकीसाठी बंद करून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.