बी-बियाणांच्या दरात भरमसाट वाढ
जोंधळा, बाजरीचा दर आवाक्याबाहेर : शेतकऱ्यांना फटका : रयत संपर्क केंद्र-कृषी पत्तीनकडे बी-बियाणे उपलब्ध
बेळगाव : बी-बियाणांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू लागला आहे. बटाटा, रताळी, भुईमूग आणि इतर पिकांची काढणी झालेल्या शिवारात जोंधळा, मका आणि बाजरीची पेरणी केली जाते. मात्र या बियाणांचे दर भरमसाट वाढल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत. रब्बी हंगामातील पेरणीला प्रारंभ झाला आहे. बटाटा, रताळी, भुईमूग आणि सोयाबीनच्या काढणीनंतर पेरणी केली जात आहे. विशेषत: जनावरांना चारा उपलब्ध व्हावा म्हणून मका, जेंधळ्याची पेरणी होत आहे. मात्र या बियाणांचे दर अधिक असल्याने शेतकऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. बाजारात जोंधळा प्रतिकिलो 60 रुपये, मका 35 रू तर बाजरी 70 रु. किलोने विकली जात आहे.
वाढती महागाई, अतिवृष्टी, वाढता खतांचा दर, वाढती मजुरी आदी कारणांमुळे शेती अडचणीत येऊ लागली आहे. त्यातच आता बियाणांच्या दरात वाढ झाल्याने एकूण पेरणी क्षेत्रावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. गतवर्षी खरीप आणि रब्बी हंगामामध्ये अपेक्षित पेरणी झाली नव्हती. पावसाअभावी कृषीखात्याने ठेवलेले उद्दिष्टही साध्य झाले नव्हते. यंदा कृषी खात्याने रब्बी हंगामात 3.66 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी रयत संपर्क केंद्र व कृषी पत्तीन संघाकडे बी-बियाणे उपलब्ध केली आहेत. मात्र या ठिकाणी अनावश्यक बि-बियाणांचा भरणा अधिक असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव खासगी दुकानदारांकडून बी-बियाणे खरेदी करावी लागत आहेत.
केवळ नदी काठावर शेतकऱ्यांना फटका
यंदाच्या हंगामात जुनपासून पुरेसा पाऊस झाल्याने पिके जोमाने आली आहेत. केवळ नदी काठावर शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शिवाय सद्य परिस्थितीत परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरणीच्या कामातही व्यत्यय आला आहे. त्यामुळे काही भागांमध्ये उघडिपीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
बियाणांचा मुबलक साठा उपलब्ध
रयत संपर्क केंद्र आणि कृषी पत्तीन संघांमध्ये बी-बियाणे, खते आणि कीटकनाशके उपलब्ध करण्यात आली आहेत. ज्वारी आणि इतर बियाणेही ठेवण्यात आली आहेत. बियाणांचा मुबलकसाठा उपलब्ध आहे.
- एम. एस. पटगुंदी (तालुका कृषी अधिकारी)