संयमी कसा असतो ?
अध्याय पहिला
कायमची मन:शांती मिळवायची असेल तर इच्छा अपेक्षा ठेवणं विसरायला हवं, जीवनात जे वाट्याला येईल ते स्वीकारण्याची तयारी ठेवली की, बुद्धी स्थिर होईल, सर्वांच्याविषयी सद्भावना निर्माण होईल आणि मन सदैव प्रसन्न राहील. माणसाचं मन प्रसन्न असलं की त्याला शारीरिक, मानसिक स्वास्थ्य लाभतं. त्याची बुद्धी स्थिर होते. इंद्रिये ज्याच्या ताब्यात नसतात तो इंद्रियांनी सुचवलेल्या गोष्टींच्यामागे धावून त्यांच्या प्राप्तीतून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो पण दरवेळी त्या वस्तू मिळतातच असे नाही. त्यामुळे अतृप्तीत वाढ होते. समजा मिळाल्या तरी त्या आणखी मिळाव्यात म्हणून प्रयत्न सुरु होतात आणि ह्या सगळ्याचा शेवट अतृप्तीत होतो. अतृप्ततेमुळे माणसाच्या मन:शांतीत बिघाड होतो. ज्ञानेन्द्राrयानी सुचवलेल्या गोष्टीच्या उपभोगातून सुख मिळते, आनंद मिळतो आणि तो सतत मिळावा हा हव्यास किंवा हावरटपणा माणसाचा घात करतो. इंद्रियांनी सुचवलेल्या गोष्टी योग्य आहेत की अयोग्य आहेत हे बुद्धीचा उपयोग करून मनुष्य ठरवू शकतो.
अयोग्य गोष्टी टाळू शकतो परंतु त्यासाठी त्याच्या मनाचा इंद्रियांवर ताबा हवा. तो तसा नसेल तर बुद्धीचे न ऐकता तो इंद्रियांच्या आहारी जातो आणि त्यांनी सुचवलेल्या गोष्टीच्या मोहात पडून त्या मिळवण्यासाठी करू नये त्या गोष्टी सहजी करू लागतो. त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्याची तयारी असते. म्हणून इंद्रियांनी सुचवलेल्या सुखांच्या मागे लागलेला मनुष्य अविवेकी निर्णय घेऊन स्वत:चा सर्वनाश करून घेतो. इंद्रियसुखांच्यामागे जो लागतो त्याचे दोनप्रकारे नुकसान होते. एक म्हणजे त्याचा ईश्वरप्राप्तीचा निश्चय मागे पडतो आणि दुसरे म्हणजे भोगांच्यामागे लागून तो बुद्धीचा दुरुपयोग करतो. हे ज्याच्या लक्षात आलेलं असतं त्याला भगवंतांनी गीतेत संयमी असं म्हंटलय. बाप्पाही स्थिरबुद्धि माणसाचं वैशिष्ट्या म्हणून पुढील श्लोकात हेच सांगतायत.
या रात्रि सर्वभूतानां तस्यां निद्राति नैव स ।
न स्वपन्तीह ते यत्र सा रात्रिस्तस्य भूमिप ।। 65।।
अर्थ-राजा, सर्व प्राणिमात्राची जी रात्र तिथे तो कधी झोपत नाही आणि ज्या गोष्टींसंबंधाने ते निद्रा घेत नाहीत ती त्याची रात्र होय. म्हणजे त्या गोष्टींकडे तो लक्ष देत नाही. विवरण-वर सांगितल्याप्रमाणे जी मंडळी इंद्रियसुखांच्यामागे लागलेली असतात त्यांना आपण आपली बुद्धी वाया घालवतोय हे लक्षातच येत नाही. म्हणजे त्यादृष्टीने ही मंडळी झोपलेलीच असतात कारण झोपलेल्या मनुष्याला नफानुकसानीची काहीच जाणीव नसते. त्याउलट ही जाणीव झालेला योगी मात्र अशा ठिकाणी जागा असतो. त्यामुळे दक्ष असतो आणि इंद्रिसुखाची इच्छा झाली तर मनाला वेळीच सावध करतो. सामान्य मंडळी मात्र भोगविलासांच्या साधनांच्या कायम शोधात असतात. म्हणजे याबाबत ती जागृत असतात. संयमी मात्र ही साधने त्याचे ध्येय गाठण्यासाठी काहीच उपयोगी नाहीत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे अशावेळी निद्रिस्त असतो. सगळ्यांच्या आयुष्यात पूर्वप्रारब्धानुसार भोगविषय येत असतात पण ते आणखीन हवेत असं वाटू लागलं की, माणसाचं अध:पतन होतं. संयमी मनुष्य मात्र सावध असल्याने नशिबाने मिळालेले भोगविषय भोगतो पण त्यापासून शांती मिळणार नाही ही खात्री असल्याने तो त्यापासून बाजूला होतो असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
सरितां पतिमायान्ति वनानि सर्वतो यथा ।
आयान्ति यं तथा कामान स शान्तिं क्वचिल्लभेत्।। 66 ।।
अर्थ- ज्याप्रमाणे सर्व बाजूनी नद्यांचे पाणी, सागराकडे येते त्याप्रमाणे त्याच्याकडे सर्व काम इच्छा येतात,
तथापि कोणापासूनही त्याला शांती प्राप्त होत नाही.
क्रमश: