वारीसाठी मानाचे अश्व आळंदीला रवाना
भाविकांच्या हस्ते पूजन : गावातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक : अंकली-आळंदी 300 कि.मी. प्रवासास सुरुवात
वार्ताहर /मांजरी
अंकली येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्व मोती व जरी पटक्याचा अश्व हिरा अशा मानाच्या अश्वांच्या अंकली ते आळंदी अशा 300 कि.मी. प्रवासास सुरुवात करण्यात आली. अंकली येथील शितोळे घराण्याकडे 192 वर्षांपासून माऊलांच्या अश्वांची परंपरा आहे. या परंपरेनुसार आषाढी वारीसाठी शितोळे घराण्याचे मानाचे अश्व अंकलीकडे प्रस्थान करतात. हैबतबाबा आरफळकर यांनी आषाढी वारीतील पालखी सोहळ्यास विशेष महत्त्व मिळवून दिले. यावेळी माऊलींच्या अश्वांचा व माऊलींच्या तंबूचा मान शितोळे घराण्याकडे आला. पिढ्या-दर-पिढ्या चालत आलेली परंपरा सध्या श्रीमंत
ऊर्जितसिंहराजे शितोळे सरकार व त्यांचे पुत्र महादजीराजे शितोळे सरकार निष्ठेने चालवत आहेत.अंकलीकर शितोळे सरकार यांच्या राजवाड्यात सकाळी 10 वाजता अंबाबाई मंदिरात पूजन व आरती करण्यात आली. जरीपटक्याचे पूजन करण्यात आले. दोन्ही अश्वांचे श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार व महादजी राजे शितोळे सरकार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. दिंडी व दोन्ही अश्व राजवाड्याबाहेर येताच भाविकांनी पाणी घालून ओवाळणी करून दर्शन घेतले. गावातील पारंपरिक मार्गांवरून ही मिरवणूक वेशीत आल्यानंतर अश्वांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, ज्ञानेश्वर गुळूंजकर आळंदीकर, राहुल शेठ भोर, सत्यवान भाऊ बवले (सरपंच), योगेश आरू, बाळासाहेब कुऱ्हाडे, विकास पाटील, अश्वत शितोळे, अंकली, जुगूळ, चंदूर, मांजरीवाडी,काडापूर, परिसरातील वारकरी उपस्थित होते.
सोहळ्यास संरक्षण देण्याची मूळ परंपरा कायम
शितोळे घराण्याकडे 192 वर्षांपासून वारीतील अश्वांचा मान आहे, हे सर्वांना माहीत आहे. मात्र, वारीला संरक्षण देणे ही मूळ परंपरा शितोळे घराण्याकडून पार पाडली जाते. वारी काळातील तंबूचा मान, वाखरी येथून माऊलींच्या पादुका हातात घेऊन जाण्याचा मान किंवा नैवेद्याचा मान या प्रथा-परंपरा आजही निष्ठेने चालू आहेत. अश्व आळंदीहून निघाल्यानंतर विविध रिंगण सोहळे नियोजनबद्धरित्या पार पाडले जाणार आहेत, अशी माहिती श्रीमंत उर्जितसिंहराजे शितोळे सरकार यांनी दिली.