हिटमॅनचा कसोटी क्रिकेटला अलविदा
सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती : वनडेत मात्र खेळत राहणार : तडकाफडकी निवृत्तीने चाहत्यांना धक्का
वृत्तसंस्था/ मुंबई
भारताचा कसोटी कर्णधार रोहित शर्माने कसोटीमधून अचानक निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला आहे. रोहितने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत कसोटीमधून निवृत्ती घेत असल्याची माहिती सर्वांना दिली. भारतीय संघ आयपीएलनंतर पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. पण त्याआधीच त्याने निवृत्ती जाहीर करत मोठा धक्का दिला. विशेष म्हणजे, रोहितने निवृत्ती जाहीर करण्याआधी त्याला कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुन हटवण्याची चर्चा सुरु होती. या दरम्यानच त्याने निवृत्त होत असल्याचा बॉम्ब टाकला आणि विषय संपवला. दुसरीकडे, वनडे व्र्रिकेटमध्ये मात्र तो खेळत राहणार आहे.
रोहित शर्माने इंस्टा स्टोरीत 280 क्रमांकाच्या टोपीचा फोटो पोस्ट केला आहे. मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. भारतीय संघाचे कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी तुमच्या प्रेमासाठी आणि पाEिठब्यासाठी आभारी आहे’, असे त्याने नमूद केले आहे.
रोहितचा निवृत्तीचा निर्णय
काही महिन्यापासून रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधील भविष्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते. गेल्या वर्षी त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर 0-3 असा क्लीन स्वीप मिळाला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या पराभवानंतर रोहितला कर्णधारपदावर राहणे कठीण वाटत होते. पण, रोहितला आशा होती की तो इंग्लंड दौऱ्यावर जाईल आणि संघाचे नेतृत्व करेल. पण मंगळवारी 6 मे रोजी निवड समितीने त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता, ज्याची माहिती बीसीसीआयलाही देण्यात आली होती, अशी माहिती सूत्राकडून मिळाली होती. दरम्यान, त्याआधीच रोहितने आपण कसोटीतून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.
रोहितची कसोटी कारकिर्द
रोहित शर्माने 6 नोव्हेंबर 2013 रोजी कोलकातामधील ईडन गार्डन्समध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. तेव्हापासून गेली 12 वर्षे कसोटी संघाचे प्रतिनिधित्व केले. या दरम्यान काही वर्ष भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. रोहितने 67 कसोटी सामन्यांमधील 116 डावांमध्ये 57.08 या स्ट्राईक रेटने आणि 40.58 च्या सरासरीने 4 हजार 301 धावा केल्या आहेत. तसेच आपल्या कसोटी कारकीर्दीत 18 अर्धशतके, 12 शतके आणि 1 द्विशतक झळकावले आहे. रोहितची 212 ही कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या होती.
भारतीय क्रिकेटच्या एका युगाचा अंत
रोहित शर्माच्या टेस्ट क्रिकेटमधून संन्यासाने भारतीय क्रिकेटच्या एका युगाचा अंत झाला आहे. त्याच्या नेतृत्वात आणि फलंदाजीने भारतीय टेस्ट संघाने अनेक यश मिळवले. आता इंग्लंड दौऱ्यापूर्वी नव्या कर्णधाराची निवड आणि संघाची रणनीती याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रोहित वनडे क्रिकेटमध्ये खेळणे सुरू ठेवणार असल्याने चाहत्यांना त्याची फलंदाजी आणि नेतृत्व पाहण्याची संधी कायम राहील.
नव्या कर्णधाराची चर्चा
भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेपासून भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 नव्या हंगामाला सुरुवात करेल. इंग्लंडमधील पाच सामन्यांच्या टेस्ट मालिकेसाठी भारताला आता नव्या कर्णधाराची गरज भासेल. यासाठी जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. मे च्या दुसऱ्या आठवड्यात निवड समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत नवा कसोटी कर्णधाराचा निर्णय होईल, असे अपेक्षित आहे.