हिंडलगा, हिरेबागेवाडीला नगरपंचायतीचा दर्जा
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : बेळगावमध्ये 10.44 कोटींतून अग्निशमन केंद्राला मंजुरी
बेंगळूर : बेळगाव तालुक्यातील हिंडलगा आणि हिरेबागेवाडी ग्राम पंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शुक्रवारी बेंगळूरमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. लोकसंख्या आणि शहरीकरणाच्या आधारावर राज्यातील अनेक ग्राम पंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारपुढे आहे. त्यानुसार शुक्रवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागातील हिरेबागेवाडी आणि पश्चिम भागातील हिंडलगा ग्राम पंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेळगावमध्ये 10.44 कोटी रुपये खर्चातून अग्निशमन केंद्राची इमारत बांधण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत विविध ठिकाणी 329.90 कोटी रु. खर्चून अग्निशमन केंद्रे स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या रकमेपैकी 244 कोटी केंद्र सरकार देणार आहे.
कारवारमध्ये नवीन इस्पितळासाठी 26.98 कोटींतून उपकरणे
कारवार इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या परिसरात बांधण्यात येणाऱ्या 450 बेड्स क्षमतेच्या नवीन इस्पितळासाठी 26.98 कोटी रुपयांतून वैद्यकीय उपकरणे व साहित्योपकरणे खरेदीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. कारवार इन्स्टिट्यूर ऑफ मेडिकल सायन्सेसच्या परिसरातील नवीन इस्पितळाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या इस्पितळाला विभागनिहाय साहित्योपकरणे पुरविण्यासाठी संक्षिप्त माहिती प्रस्तावित करण्यात आली आहे. गरीब रुग्ण आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची क्षमता वाढविण्यासाठी यामुळे अनुकूल होणार आहे.
दिव्यांग कर्मचाऱ्यांना बदल्यांमध्ये 4 टक्के आरक्षण
राज्यातील दिव्यांगांना बदल्यांमध्ये 4 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अ आणि ब श्रेणीतील दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना बदल्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम-2016 मध्ये परिभाषित केल्यानुसार दिव्यांगाचे प्रमाण अधिक असलेल्या ब श्रेणी आणि अ श्रेणी (कनिष्ठ गट) पदोन्नतीमध्ये 4 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी दिली.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या निवृत्ती वयात वाढ
राज्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांचे निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षांपर्यंत वाढविण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सरकारी इस्पितळांमधील तज्ञ डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
सैन्याचे अभिनंदन
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने दिलेल्या ठोस प्रत्युत्तराच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र दलाचे शौय, साहसाबद्दल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अभिनंदन करण्यात आले. पाकिस्तानविरुद्धच्या लढ्यात देशातील 140 कोटी जनता एकत्रित आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत ठरलेल्या पाकिस्तानला योग्य प्रत्युत्तर दिले जात आहे. सैन्याच्या या कामगिरीबद्दल बैठकीत अभिनंदन करण्यात आले.