महामार्ग रोको एक दिवस पुढे ढकलला
साखरमंत्री शिवानंद पाटील यांनी गुर्लापूर आंदोलनस्थळी शेतकरी नेत्यांची घेतली भेट : मध्यस्थी निष्फळ
चिकोडी : ऊस दरासाठी गुर्लापूर क्रॉस येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी गुरुवारी संध्याकाळी साखरमंत्री शिवानंद पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांची मध्यस्थीही निष्फळ ठरली. साखरमंत्री शिवानंद पाटील यांनी राज्य सरकारला आणखी दोन दिवस चर्चा करण्यासाठी मुदत देण्याची मागणी केली. शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी ही मागणी मान्य केली असली तरी मंत्री परतत असताना आंदोलकांनी त्यांच्या वाहनावर चप्पल व दगडफेक केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. आंदोलनस्थळी आलेल्या मंत्री पाटील यांनी, शेतकरी नेत्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री व कारखानदार यांच्या बैठकीस यावे, शुक्रवारी होणारे महामार्ग रोको आंदोलन एक दिवस पुढे ढकलून वेळ द्यावा, असे आवाहन केले. यावर शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी यापैकी एक मागणी मान्य केली.
शुक्रवारी होणारे रास्तारोको आंदोलन एक दिवस पुढे ढकलले आहे. पण, शुक्रवारी संध्याकाळी दराबाबत योग्य निर्णय जाहीर करावा. निर्णय न झाल्यास शनिवारी लाखो शेतकरी महामार्गांवर आंदोलन सुरू करतील. आंदोलनातील कुणीही चर्चेसाठी येणार नाहीत. सरकारच्यावतीने शुक्रवारी निर्णय घेऊन येथे येऊन जाहीर करावे. तसे न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष चुन्नप्पा पुजारी, गौरवध्यक्ष शशिकांत पड्सलगी यांनी साखर मंत्री यांच्याशी चर्चा करून शेतक्रयांसमोर आपला निर्णय जाहीर केला. त्यामुळे महामार्ग रोको पुढे गेला असला तरी दराची घोषणा करावी लागणार आहे. उसाला 3500 रुपये मागणी केली आहे. जिल्हाधिकारी यांनी केलेल्या मध्यस्थीने 3200 रुपयांसाठी कारखानदार तयार आहेत. किमान 3400 दर शुक्रवारी जाहीर करावा. शेतकरी व शेतकरी प्रतिनिधी कुणीही चर्चेला येणार नसल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला.
शेवटी जाताना मंत्र्यांच्या गाडीवर चप्पल, दगडफेक
गेल्या सात दिवसांपासून शेतकऱ्यांचे ऊस दरासाठी गुर्लापूर क्रॉस येथे आंदोलन सुरू असून गुऊवारी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या स्थळी भेट देऊन कोणताही ठोस निर्णय न घेता पुन्हा दोन दिवसांची मुदत वाढवून घेऊन जात असलेल्या राज्याचे साखरमंत्री शिवानंद पाटील यांच्या वाहनावर संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी चप्पल व दगडफेक केली. बुधवारी राज्याचे कायदा मंत्री एच. के. पाटील यांच्या वाहनावरही दगडफेक करण्यात आली होती. मंत्री उशिराने आंदोलनस्थळी आल्याने व वाद न मिटविल्याने संतप्त शेतकऱ्यांनी दगडफेक केल्याचे समजते.