भारत-बांगलादेशदरम्यान उच्चस्तरीय बैठक
बीएसएफ अन् बीजीबीच्या कमांडरचा सहभाग
वृत्तसंस्था/मालदा
पश्चिम बंगालच्या मालदा येथे घडलेल्या घटनेनंतर बीएसएफ आणि बॉर्डर गार्ड बांगलादेश (बीजीबी) दरम्यान एक उच्चस्तरीय बैठक गुरुवारी झाली आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये झटापट झाली होती. मालदामध्ये सुखदेवपूर सीमेवर पिकचोरीच्या आरोपांनंतर दोन्ही देशांच्या नागरिकांना परस्परांवर दगडफेक केली होती. हजारो ग्रामस्थ भारत-बांगलादेश सीमेवर एकत्र आल्याने स्थिती तणावपूर्ण झाली होती.
या तणावादरम्यान बीएसएफ आणि बीजीबीने हस्तक्षेप करत स्थितीवर नियंत्रण मिळविले होते. एकीकडे बीजीबीने सीमेवर कुंपण निर्माण करण्यास आक्षेप घेतला होता. या पार्श्वभूमीवर बीओपी, सोनमस्जिद येथील महत्त्वाच्या सेक्टरमध्ये बीएसएफ आणि बीजीबीदरम्यान बैठक झाली आहे. या बैठकीत आंतरराष्ट्रीय सीमेच्या महत्त्वाला अधोरेखित करण्यात आले आहे. या बैठकीत बीएसएफचे उपमहानिरीक्षक आणि बीजीबीचे सेक्टर कमांडर सहभागी झाले.
भारताच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे नेतृत्व बीएसएफचे तरुण कुमार गौतम तर बीजीबीच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व मोहम्मद इमरान इब्ने रौफ यांनी केले. यात दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारीही सामील राहिले. बैठकीतील चर्चा परस्पर सीमा व्यवस्थापन हितांवर केंद्रीत राहिली, ज्यात अवैध कारवाया रोखणे आणि सीमा वादांविषयी प्रसारमाध्यमांमधील गैरसमजत दूर करण्यावर जोर देण्यात आला. या चर्चेत मालदा येथे अलिकडेच घडलेल्या घटनेचा उल्लेख झाला, तसेच अशाप्रकारच्या घटना रोखण्यासाठी सक्रीय सहकार्याच्या आवश्यकतेवर भर देण्यात आला आहे.
परस्पर सहकार्यावर जोर
दोन्ही शिष्टमंडळांनी मुक्त संचार, परस्पर विश्वास आणि निरंतर सहकार्याच्या आवश्यकतेवर जोर दिला आहे. सकारात्मक परिणामाचा उल्लेख करत बीएसएफचे जनसंपर्क अधिकारी एन.के. पांडे यांनी सीमेची सुरक्षा आणि शेजारी देशासोबतच्या संबंधांना चालना देण्याच्या संयुक्त उद्देशांची पुष्टी दिली. ही बैठक भारत-बांगलादेश सीमेवर शांतता अन् सुरक्षा कायम राखण्यासाठी महत्त्वपूर्ण सक्रीय उपाययोजना आणि भागीदारी दर्शविते.