वसगडेत ‘महा रेल’ची मनमानी; शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट
पुलाचे उद्घाटन रोखण्याचा इशारा, रस्ता रोकोचीही चेतावणी
वसगडे :
वसगडे येथील नागाव रेल्वे गेटवर उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलाचे उद्घाटन ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र, सेवारस्ता, भूसंपादन मोबदला आणि अंडरपास या महत्त्वाच्या मुद्द्यांवर कोणताही निर्णय न घेताच उद्घाटनाच्या हालचाली केल्यामुळे बाधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
शेतकरी शफिक जमादार यांनी सांगितले की, मार्च २०२१ मध्ये गट नं. ४२० मधील ०.०५.४९ हेक्टर शेतजमीन संपादित केली जाणार असल्याची माहिती प्रसिद्ध झाली. मात्र, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आले. मोबदल्यासाठी १७ महिन्यांपासून मागणी अर्ज देऊनही कोणतीही भरपाई मिळालेली नाही.
तसेच, अंडरपासचे (RUB) कामही परवानगी किंवा मोबदल्याविना सुरू करण्यात आले असून, त्यामुळे शेतीला जाण्याचा रस्ताही बंद झाला आहे. शेतकऱ्यांनी अनेकवेळा लेखी निवेदने देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप जमादार यांनी केला आहे.
महारेलने शेतीला जाण्यासाठी तीन मीटर रस्ता करून मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते, पण अद्याप कोणतीच अंमलबजावणी झाली नाही. पुलाचे काम पूर्ण झाले असूनही भूसंपादन मोबदला मिळालेला नाही, अशी तक्रार आहे.
- शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या
भूसंपादन मोबदला अदा करूनच पुलाचे उद्घाटन करावे.
मोबदला न मिळेपर्यंत अंडरपासचे काम थांबवावे.
- रस्ता रोकोचा इशारा :
भूसंपादन कायदा २०१३ मधील तरतुदींचा भंग करून महारेलने मनमानी केली असून, उद्घाटन थांबवले नाही तर रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे.