मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चतुर्थीत अवजड वाहनांना बंदी
प्रतिनिधी/ पणजी
गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तीचे आगमन, गणेश विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक हिताच्या कारणासाठी मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वर वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनांहून अधिक वाहनांना मोटार वाहन अधिनियम 1988च्या कलम 155 मधील तरतुदीनुसार वाहतूक बंदी करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वरील मुंबई ते सावंतवाडी या दरम्यान अवजड वाहनांना बंदी राहणार आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास म्हणून 5 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 8 सप्टेंबर रोजी 11 वाजेपर्यंत या कालावधीत बंदी राहणार आहे. तसेच 5 व 7 दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास यासाठी 11 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते 13 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपर्यंत ही बंदी राहणार आहे. अनंत चतुर्दशी 11 दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन, परतीच्या प्रवासाकरीता 17 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 18 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपर्यंत ही बंदी राहणार आहे.
वाहतूक बंदीचे निर्बंध दूध, पेट्रोल किंवा डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला व नाशवंत माल आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाहीत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66च्या रस्ता ऊंदीकरण, रस्ता दुऊस्ती कामकाज आणि साहित्य, माल ने-आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही. यासंदर्भात वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग, महामार्ग पोलीस यांनी प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही करणे गरजेचे आहे.