For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Heavy Rain: अवकाळी पावसामुळे शेतीची कामे खोळंबली, शेतीत पाणी साचल्याने नुकसान

05:13 PM May 25, 2025 IST | Snehal Patil
heavy rain  अवकाळी पावसामुळे शेतीची कामे खोळंबली  शेतीत पाणी साचल्याने नुकसान
Advertisement

पाऊस उघडण्याचे नावच घेत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय

Advertisement

By : अभिजीत शेळके

सांगली (बागणी) : राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हा पाऊस जिरवणीचा झाला असल्याने शेतात पाणी साचून राहिले आहे. शेतकऱ्यांनी अजून शेतात मशागती न करता शेती नांगरट करून ठेवली आहे. पाऊस उघडण्याचे नावच घेत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

Advertisement

बदलत्या हवामानामुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. अवेळी आलेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील आणि उन्हाळी पिकांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. वारणा काठच्या सर्वच भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे नांगरणी, मशागत, रोपवाटिका उभारणी आणि पेरण्या खोळंबल्या आहेत. काही ठिकाणी गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे उभ्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळी हंगामावर देखील मोठा परिणाम झाला आहे.

शेतकरी सध्या भाताच्या पेरण्या, रोपवाटिका, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची यांसारख्या भाजीपाला पिकांची तयारी करत होते. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून, नियोजित कामे थांबवावी लागली आहेत. पेरणीसाठी आवश्यक असलेली मशागत करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. ऊस लागण करण्यासाठी शेतीची मशागत खोळंबली आहे.

पावसाचे पाणी शेतात साचून राहिले असल्याने व केरळात मान्सून सक्रिय झाला असल्याने शेतकरी हताश झाला आहे. या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्याठिकाणी भाजीपाला आणि कडधान्यांची लागवड आधीच झालेली होती, तिथे पिके पाण्याने कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही शेतांमध्ये गहू, हरभरा, सुर्यफूल, भात, कांदा आदी पिकांचे नुकसान झाले आहे.

गारपीट झालेल्या भागांमध्ये फुलपाने गळून पडल्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे. शेतकऱ्यांनी आधीच खत, बियाणे, औषधे, मजुरी यासाठी मोठा खर्च केलेला असतो. आता पावसामुळे त्या सगळ्यावर पाणी फिरले आहे.
बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे पुन्हा लागवड करण्यासाठी पुरेसे भांडवलही नाही. त्यामुळे अनेक शेतकरी कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. या अवकाळीचा फटका छोट्या शेतकऱ्यांना सहन न होणारा आहे.

सरकारने या शेतकऱ्यांना बी, बियाणे व आर्थिक मदतीची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. राज्य शासनाने त्वरीत नुकसानग्रस्त भागांमध्ये पाहणी करून पंचनामे करावेत आणि नुकसानभरपाईची प्रक्रिया लवकर सुरू करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. आम्ही वारंवार नैसर्गिक आपत्तीचा सामना करतो आहोत. सरकारने आमच्यावर दया करावी आणि मदत त्वरीत जाहीर करावी, असे मत शेतकरी संघटनेचे नेते संभाजी चौगुले यांनी व्यक्त केले आहे

हवामान खात्याचा इशारा

पुढील काही दिवसांमध्ये आणखी काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील शेतीची कामे करताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. या अवकाळी पावसाने शेतक्रयाचे मात्र कंबरडे मोडले आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजी पाला केलेल्या शेतकऱ्यांचा देखील हाता तोंडाशी आलेला घास गेला आहे. त्यामुळे शेतकरी आता पुन्हा कर्जाच्या खाईत जाणार आहे हे मात्र नक्की.

शेतकऱ्याला कोणी वाली नाही

"शेतकऱ्यांनी एकत्र येत आपल्या मालाचा हमी भाव आपणच ठरवला पाहिजे. अवकाळी पाऊस, महापूर, दुष्काळ अशी संकटे शेतकऱ्यावर येतच राहणार आहेत. यावर तोडगा एकच आहे सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत आपल्या मालाचा भाव आपण ठरवणे, तरच अशा संकटांचा सामना शेतकरी करू शकेल. नाहीतर शेतकरी कर्ज बाजारी होऊन देशो घडीला लागतील. सरकार कोणाचेही येऊ दे ते मोठ्या उद्योजकांचे व नोकरदार वर्गाचे असते. शेतकऱ्यांचे नाही. शेतकऱ्यांना कोणी वाली नाही खर आहे."

- दौलत ऊर्फ महेश पाटील

Advertisement
Tags :

.