पणजीत भाडे थकबाकीदार दुकानदारांची सुनावणी
सात दुकानदारांची 1.6 कोटी थकबाकी : भाडेकरारही संपुष्टात आल्यामुळे व्यवसाय अनधिकृत
पणजी : भाड्यापोटी देणे असलेली सुमारे 1.6 कोटी ऊपये थकबाकी अद्याप न भरल्याबद्दल तसेच लीज कराराचेही नूतनीकरण न केल्याबद्दल पणजी मनपाने (सीसीपी) सात दुकानदारांना बजावलेल्या नोटिसांनुसार आता त्यांची सुनावणी प्रारंभ करण्यात आली आहे. या सुनावणीची पहिली फेरी पूर्ण झाली आहे, अशी माहिती मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली गेल्या कित्येक वर्षांपासून या दुकानदारांनी भाडेच भरले नव्हते. त्याची थकित रक्कम सुमारे 1.6 कोटी ऊपये एवढी असल्याचे समजले आहे. जारी करण्यात आलेल्या या नोटिसीत सीसीपीने प्रत्येक दुकानदाराने स्वत: किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीद्वारे मालमत्ता अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यानुसार दि. 22 डिसेंबरपासून या दुकानासंबंधी सुनावणी प्रारंभ करण्यात आली होती. संबंधित दुकानांचा भाडेकरार संपला असल्याने त्याचे नूतनीकरण करावे यासंबंधी सीसीपीने त्यांना अनेकदा नोटिसा बजावल्या होत्या. परंतु प्रत्येकवेळी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी भाड्याची रक्कम कोटीच्या घरात पोहोचली आहे. त्याशिवाय या दुकानांचा भाडेकरारही संपुष्टात आल्यामुळे आता त्यांचा व्यवसाय अनधिकृत ठरत असल्याचे सीसीपीने म्हटले आहे.
अन्य थकबाकीदारांनाही लवकरच नोटिसा
दरम्यान, पहिल्या फेरीत सात दुकानदारांना नोटीस बजावून मालमत्ता अधिकाऱ्यांसमोर बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे. त्याशिवाय अन्य अनेक दुकानदारांनीही कराराचे नूतनीकरण केलेले नाही, तसेच भाडे भरण्यासही अपयशी ठरले आहेत. अशा अन्य दुकानदारांही नोटिसा बजावण्यात येतील अशी माहिती सदर अधिकाऱ्याने दिली आहे.