आयुष्मान नोंदणीसाठी आरोग्य खात्याची कसरत
आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उद्दिष्ट गाठण्याचे प्रयत्न
बेळगाव : गोर-गरिबांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या महत्वाकांक्षी आयुष्मान भारत आरोग्य योजना नोंदणी करण्यात जिल्हा पिछाडीवर पडल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे या योजनेत गोर-गरिबांना समावून घेऊन लाभ करून देण्यासाठी जिल्हा आरोग्य खात्याकडून घरोघरी जाऊन नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नोंदणी कामाला चालना देण्यात आली आहे. सर्वांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारकडून 2018 मध्ये आयुष्मान भारत आरोग्य योजना सुरू केली होती. मात्र ही योजना समर्पकपणे राबविण्यात आरोग्य खात्याकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक नागरिक या आरोग्य योजनेच्या सुविधांपासून वंचित राहिले आहेत. बेळगाव जिल्ह्dयाला 47.63 टक्के नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र आतापर्यंत केवळ 13 टक्के उद्दिष्ट गाठण्यात आले आहे. सदर योजनेची जागृती करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जागृती करून नोंदणी करून घेतली जात आहे. ग्रामीण भागात आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन नोंदणी करून घेऊन आयुष्मान कार्ड उपलब्ध करून दिले जात आहे.
नागरिकांच्याही पुढाकाराची गरज
आधारकार्ड, बीपीएल रेशनकार्ड, मोबाईल क्रमांकाला लिंक असेल तर ओटीपीच्या आधाराने तात्काळ नोंदणी करून दिली जात आहे. यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे, असे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. बीपीएल रेशनकार्ड धारकांना राष्ट्रीय स्वास्थ्य बिमा योजनेंतर्गत नोंदणीकृत लाभार्थ्यांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार करत आहेत. एपीएल कार्डधारक अथवा बीपीएल कार्ड नसलेल्यांना शेकडा 30 टक्के चिकित्सा खर्च दिला जातो. म्हणजे 1.5 लाख उपचार खर्च देण्याची सोय आहे. यामध्ये सरकारी व खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे.
घरोघरी जाऊन नोंदणी करण्याचे काम सुरू
आयुष्मान आरोग्य योजना कार्ड नोंदणी करून घेण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, घरोघरी जाऊन नोंदणी करून घेण्याचे काम सुरू आहे.
जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी