भात कापणी-मळणीसह सुगीची कामे अंतिम टप्प्यात
ऊस तोडणीच्या कामालाही प्रारंभ : जांबोटी-ओलमणी परिसरातील शेतकरी वर्गाची एकच धावपळ
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी-ओलमणी परिसरात भात कापणी व भात मळणी आदी सुगीची कामे अंतिम टप्प्यात आली असून मळण्याच्या कामांना सर्वत्र वेग आल्यामुळे शेतकरी वर्गाची एकच धावपळ सुरू आहे. या परिसरात यावर्षी मे महिन्यापासूनच मान्सूनचा पावसाने शेतकरी वर्गांना बऱ्यापैकी साथ दिल्यामुळे खरीप हंगामातील भात पेरणीसह, भात रोप लागवड, रताळी लागवड, भुईमूग शेंगा पेरणी, नाचणी लागवड आदी कामे वेळेत पूर्ण झाली होती. तसेच त्यानंतरच्या कालावधीत देखील या परिसरात पिकांना अनुकूल असा पाऊस पडल्यामुळे सर्वच पिके बहरली होती. मात्र या परिसरात सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्वच पिकांना धोका निर्माण झाला पावसाच्या माऱ्यामुळे ऐन पोसवणीच्या वेळी अनेक ठिकाणी भातपिके भुईसपाट झाली. तसेच शेतवडीत कुजून गेल्याने भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. दिवाळीपर्यंत पाऊस सुरूच राहिल्याने यावर्षी सुगीची कामे बऱ्याच कालावधीपर्यंत लांबणीवर पडली होती.
गेल्या महिन्यापासून या परिसरात पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्यामुळे जांबोटी परिसरातील शेतकरी वर्गाने खरीप हंगामातील भात कापणी, मळणी भुईमूग, रताळी काढणी आदी कामांना प्रारंभ केला होता. सध्या या भागातील भात कापणी व भात मळणीची कामे करण्यास शेतकरी वर्गांना अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. प्रारंभी या भागातील शेतकरी वर्गाने माळरानावरील भात कापणी व भात मळणीच्या कामांना प्रारंभ करून सदर कामे पूर्ण केली आहेत. डिसेंबर महिन्यापासून या भागातील शेतकरी वर्गाने पाणथळ शेतवडीतील भात कापणी व भात मळणीच्या कामाला सुरुवात केली असून या भागातील भात मळणीची कामे आता अंतिम टप्प्यात आली असून या भागातील भात मळण्या चालू पंधरवड्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. भात मळणी व भात कापणीची कामे एकाचवेळी सुरू झाल्यामुळे मजूर वर्गाची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाल्याने मजुरांना चांगला भाव मिळत आहे. मात्र कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतकरी वर्गाची एकच धावपळ सुरू आहे.
ऊस तोडणीलाही प्रारंभ
सध्या या भागात भात मळणी व इतर सुगीच्या कामाबरोबरच शेतकरी वर्गाने शेतवडीत ऊस तोडणीच्या कामाला देखील प्रारंभ केला असून ही कामे फेब्रुवारी महिन्यापर्यंत चालणार आहेत. पर गावच्या ऊस तोडणी टोळ्dया गावोगावी दाखल झाल्या आहेत. सर्वच कामे एकाचवेळी सुरू असल्यामुळे शेतवडीत शेतकऱ्यांची एकच धावपळ सुरू आहे. भात मळणीच्या कामानंतर या परिसरातील शेतकरी वर्ग उन्हाळी मिरची लागवड व काजू बागांच्या साफसफाई कामांना प्रारंभ करण्याची शक्यता आहे.