‘ज्ञानवापी’साठी लढणारे हरिहर पांडे यांचे निधन
वृत्तसंस्था/ वाराणसी
ज्ञानवापी संकुलातील मशीद हटवण्यासाठी 1991 मध्ये गुन्हा दाखल करणाऱ्या हरिहर पांडे यांचे रविवारी निधन झाले. बीएचयू येथील सर सुंदरलाल ऊग्णालयात वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 33 वर्षे ज्ञानवापीसंबंधीचा खटला लढत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. हरिहर पांडे हे एक साधे, दृढनिश्चयी आणि सनातन परंपरेबद्दल प्रेमळ व्यक्ती होते. आज काशी ज्ञानवापी मुक्ती चळवळीचे एक युग संपले आहे. भारतीय सनातन संस्कृती आणि भगवान काशी विश्वनाथ यांच्यावर त्यांची अपार भक्ती व श्रद्धा होती.
ज्ञानवापी प्रकरणी तिघांनी दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला होता. यामध्ये हरिहर पांडे, सोमनाथ व्यास आणि संपूर्णानंद विद्यापीठातील प्राध्यापक रामरंग शर्मा यांचा समावेश होता. न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर काही वर्षांनी पंडित सोमनाथ व्यास आणि रामरंग शर्मा यांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात हरिहर पांडे हा एकमेव पक्ष उरला होता.
काशीमधील अनेक संतांनी हरिहर पांडे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोकभावना व्यक्त केल्या आहेत. ‘हरिहर पांडेजी यांचे निधन सनातन परंपरेचे पालन करणाऱ्या आपल्या सर्वांसाठी अत्यंत दु:खद आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांप्रती मनापासून शोक व्यक्त करतो, असे त्यांचे निकटवर्तीय स्वामी जितेंद्रनंद सरस्वती यांनी म्हटले आहे.