सावंतवाडी टर्मिनस झाले असते तर आज प्रवाशांचे हाल झाले नसते
बाळा गावडेंची टीका
सावंतवाडी | प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे पेडणे येथील बोगद्यात पाणी साठले. त्यामुळे कोकण रेल्वेने अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले. आज जर सावंतवाडी टर्मिनस असते तर अनेक रेल्वे गाड्यांना सावंतवाडी टर्मिनसवर थांबा मिळाला असता . टर्मिनस पूर्णत्वास आले असते तर आज प्रवाशांचे हाल झाले नसते असे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)चे जिल्हा समन्वयक बाळा गावडे यांनी म्हटले आहे . कोकण रेल्वेला जवळपास 25 वर्ष पूर्ण झालीत. कोकणात अशी पावसाळी परिस्थिती असताना रेल्वे टर्मिनलची मागणी सावंतवाडीत सातत्याने झाली . तसेच टर्मिनसचे भूमिपूजन तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले. परंतु प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही. जर काम सुरू झाले असते तर आज रेल्वे गाड्यांना सावंतवाडी टर्मिनसला थांबा मिळाला असता आणि येथून नवीन गाड्या निघाल्या असत्या. मंत्री दीपक केसरकर यांनी चांदा ते बांदा या योजनेतून रेल हॉटेल टर्मिनससाठी निधी जाहीर केलेला पण तो निधी सुद्धा का दिला नाही? म्हणजे विकासाची वल्गना करणाऱ्या मंत्री दीपक केसरकरांमुळेच आज रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्यात. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. त्याला जबाबदार मंत्री केसरकरच आहेत अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा समन्वयक बाळा गावडे यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सारखीच रेल्वे टर्मिनसची सुद्धा फक्त घोषणाच ठरली आहे. रेल्वे टर्मिनस सुरू झाले असते तर सावंतवाडी टर्मिनस पर्यंत येऊन परत मुंबईच्या दिशेने गाड्या धाऊ शकल्या असत्या. आता मात्र त्या गाड्या धाऊ शकत नाहीत. आणि बऱ्याच गाड्यांना थांबा मिळत नाही. प्रवाशांना होणाऱ्या त्रासाला केसरकरच जबाबदार आहेत असे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)चे जिल्हा समन्वयक बाळा गावडे यांनी म्हटले