इस्कॉनच्यावतीने गौरपौर्णिमा उत्साहात
बेळगाव : सत्य युगात ध्यानाद्वारे, त्रेता युगात यज्ञाद्वारे, द्वापार युगात विग्रह सेवेद्वारे तर कली युगात केवळ हरिनाम संकीर्तनाद्वारे भगवंतप्राप्ती शक्य आहे. याच युगधर्म हरिनाम संकीर्तनाचा प्रचार करण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभु अवतीर्ण झाले व त्यांनी पात्र-अपात्र, गरीब-श्रीमंत, जात-पात असा भेदभाव न करता सर्वांना हरिनाम प्रदान केले. हे हरिनाम घेण्यासाठी कोणतेही कठोर नियम नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने हरिनाम अमृताचे पान करून आपले जीवन सार्थ करावे, असे उदगार पूजनीय अच्युत गोपाल प्रभू यांनी काढले. आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघ बेळगाव येथील श्री श्री राधा गोकुलानंद मंदिर येथे श्री गौर पौर्णिमा महोत्सवाच्या वेळी ते बोलत होते. पहाटे 4:30 वा. मंगलारतीने कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर नरसिंह आरती, तुलसी आरती, नामजप, दर्शन आरती, गुरुपूजा व श्री गौर कथा आदी कार्यक्रम झाले. सायंकाळी 6 वा. श्री श्री गौर नीताई यांच्या विग्रहाना अभिषेक घालण्यात आला. गोवा इस्कॉनचे प्रचारक अच्युत गोपाल प्रभू यांचे गौर लीलेवर प्रवचन झाले. महाआरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.