सोयाबीनची होणार हमीभावाने खरेदी
केंद्र सरकारचा निर्णय : एपीएमसीमध्ये सुविधा : शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू : अंतिम मुदत 10 ऑक्टोबरपर्यंत
बेळगाव : केंद्र सरकारने आधारभूत किंमत योजनेंतर्गत 4 उत्पादित शेती मालांना खरेदीची मान्यता दिली आहे. यामध्ये तांदूळ, सूर्यफूल, सोयाबीन, उडीद आदींचा समावेश आहे. शासनाकडून सूर्यफूल खरेदीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. शिवाय शेतकऱ्यांची नोंदणी केली जात आहे. अंतिम मुदत 10 ऑक्टोबरपर्यंत आहे. बेळगाव जिल्ह्यातून 662 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. केंद्र सरकारने एपीएमसीमधून सोयाबीन खरेदी करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे यंदा प्रथमच एपीएमसीमध्ये सोयाबीन हमी भावाने खरेदी केले जाणार आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. मात्र केंद्र सरकारने मंजूर केलेले तेवढेच धान्य खरेदी केले जाईल, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीने दिली आहे.
यंदा 15 लाख क्विंटल डाळीच्या उत्पादनाचे उद्दिष्ट
बेळगाव, बिदर, धारवाड, गदग, कोप्पळ, यादगीर, आदी जिल्ह्यामध्ये कडधान्याचे उत्पादन घेतले जाते. यंदा राज्यात 15 लाख क्विंटल डाळीच्या उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर बेळगाव जिल्ह्यात सोयाबीनचे 4725 क्विंटल उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांकडून सोयाबीन, सूर्यफूल आणि इतर पिकांचे खरेदी केली जाणार आहे. काही भागात काढणीला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे खरेदी केंद्रे सुरू होण्यास उशिर झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांतून होत आहेत.
सॉफ्टवेअरची निर्मिती
आधारभूत किंमत योजनेंतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या शेतमालासाठी नवीन सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या सोयाबीन तर पुढील आठवड्यापासून सूर्यफूल, उडीद उत्पादक शेतकऱ्यांच्या नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे.