राज्यातील पाच जिल्ह्यांत भूजल उपशाचे प्रमाण विपरित
केंद्रीय भूजल मंडळाच्या अहवालातून स्पष्ट
बेंगळूर : राज्यातील कूपनलिकांसह विविध स्रोतांमार्फत भूगर्भातील पाणी उपशाचे प्रमाण वाढले आहे. त्यातही पाच जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण विपरित असल्याचे केंद्रीय भूजल मंडळाने म्हटले आहे. मंडळाच्या 2025 सालातील अहवालात कोलार, बेंगळूर शहर, चिक्कबळ्ळापूर, बेंगळूर ग्रामीण व चित्रदुर्ग जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भूजल साठ्याचा वापर झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. बेंगळूर दक्षिण (पूर्वी रामनगर जिल्हा) आणि तुमकूर जिल्ह्यातील भूजल स्थिती गंभीर बनली आहे. बेळगाव, विजयनगर, बागलकोट, चामराजनगर, गदग आणि दावणगेरे जिल्ह्यांमध्ये अती वापर झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. भूजलाचे पुनर्भरण करण्यासाठी जलशक्ती अभियानांतर्गत राज्यात 17 लाख जलसंरक्षण युनिट निर्माण करण्यात आले आहे. यातून भूजल स्थितीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात एकंदर भूजल वापराचे प्रमाण 2024 मध्ये 68.44 टक्के होते. 2025 मध्ये ते 66.49 टक्क्यांवर कमी झाले आहे, असेही केंद्रीय भूजल मंडळाने म्हटले आहे.