Success Story : तिखट मिरचीची गोड कहाणी, 12 गुठ्यातून 4 लाखांचं उत्पन्न
शेती व्यवसायासह पीक पद्धतीचा अभ्यास करुन पाटील यांनी शेतात वेगळा प्रयोग करायचे ठरवले
By : मालोजी पाटील
गोकुळ शिरगांव : शेतकऱ्यांना सातत्यानं विविध अडचणींचा सामना करावा लागतो. कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटे येतात. मात्र, यातूनसुद्धा मार्ग काढत काही शेतकरी यशस्वी शेती करत भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. अशाच गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील एका शेतकरी जोडप्याने मिरचीच्या शेतीतून लाखोंचा नफा मिळवला आहे. ऊस शेतीला फाटा देत त्यांनी मिरची पीक करण्याचा निर्णय घेतला. आज ते त्यातून चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. वैजयंती पाटील व उदय पाटील असे या शेतकरी दाम्पत्याचे नाव आहे.
उदय पाटील यांची गोकुळ शिरगाव येथे जवळपास दहा ते बारा एकर शेत जमीन आहे. ते या जमिनीत उसासह विविध पिके घेत आहेत. पण त्यांच्या पत्नीने वेगळ्या पद्धतीची शेती करून मिरची लागवड करण्याचा निर्णय घेतला व त्याला उदय पाटील यांच्यासह संपूर्ण परिवाराने त्यांना मोलाची साथ दिली. मिरची पिकातून त्यांनी भरघोस उत्पन्न घेतलं आहे. पाटील यांनी भाजीपाला, ऊस यासारख्या फळबागांचे प्रयोग केले, मात्र खर्च वजा होत हाती निराशाच येत होती.
शेती व्यवसायासह पीक पद्धतीचा अभ्यास करुन पाटील यांनी शेतात वेगळा प्रयोग करायचे ठरवले. उत्पन्न केवळ फळबागेतूनच पदरी पडते असे नाहीतर पालेभाज्यातूनही बळीराजा लखपती होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. पाटील यांच्या फळबागेच्या क्षेत्रावर आता मिरचीची शेती बहरली आहे. अशा रखरखत्या उन्हात झाडांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असून हे उन्हाळ्याचे दोन महिने खूप महत्त्वाचे आहेत. जून महिन्यानंतर सुद्धा आम्हाला या पिकातून मोठा लाभ मिळणार आहे. त्यामुळे एकदा झाड लावले तर आठ महिने हे झाड आपल्याला फायदा देणार आहे.
आज येणारे उत्पादन पाहून व यातून मिळणारा नफा पाहता शेतीही फायद्याचीच आहे. त्याचबरोबर यासाठी खर्च बराच करावा लागतो आणि बऱ्याच वेळेला निसर्गाची साथ सुद्धा या ठिकाणी मिळावी लागते. या शेती प्रयोगासाठी गावातील प्रगतशील शेतकरी बाबासाहेब पाटील ,कृषी अधिकारी आकाश माने, सी. एस भोई, संदीप कांबळे, बी. एस. पाटील यांची आम्हाला मदत झाली आहे. शेतीमध्ये नक्कीच फायदा आहे. वेगळ्या पद्धतीने शेती तरुणांनी करणे सध्याची गरज बनली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
12 गुंठे क्षेत्रात त्यांनी झिगझॅग पद्धत वापरून जी 999 ( ब्लॅक) या मिरचीची लागवड केली आहे. यावेळी वैजयंती पाटील यांनी तरुण भारत संवादशी बोलताना सांगितले की, या ठिकाणी 2000 झाडे लावलेली असून जवळपास सात टन यातून उत्पादन निघेल अशी आशा आहे . एक मिरची दहा ग्रॅम ते पंधरा ग्रॅमची असून या मिरचीची लांबी सहा इंच इतकी आहे. त्यामुळे मिरच्या वजनाला सुद्धा चांगल्या भरत आहेत.आता आम्ही दर दिवशी माल काढून पाठवत आहोत.
मिरचीचा भाव कधी 30 तर कधी 100 रुपये किलोला मिळत आहे. त्यामुळे यामध्ये सुद्धा तेजी-मंदी आहेच. मिरची जर 100 शंभर रुपये किलो गेली तर सात टनाचा हिशोब केला तर सात लाख रुपये उत्पादन निघते, पण दर चढ-उतार असल्याने चार-पाच लाख रुपये सहज मिळून जातील, असे त्यांनी सांगितले.